अहिल्यानगर : दि.२ ते ४ जुलै दरम्यान पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या भाविकांसाठी खा. नीलेश लंके यांच्या संकल्पनेतून नीलेश लंके प्रतिष्ठान व आपला मावळा संघटनेच्या वतीने आयोजित विशेष महाप्रसाद उपक्रमास वारकऱ्यांचा उदंड प्रतिसाद लाभला. तीन दिवसांत तब्बल ३ लाख ५० हजार भाविकांनी वडापाव, भजी, चहाचा आस्वाद घेतला.
सुरूवातीला २ लाख भाविकांसाठी वडापाव, भजीपाव, चहा, बिस्किटे, केळी व पाणी बाटली यांचे नियोजन होते. मात्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने केवळ तीन दिवसांत ३.५ लाख वडापाव, हजारो लिटर चहा व टनामध्ये फळे आणि पाण्याच्या बाटल्या भाविकांच्या सेवेत अर्पण करण्यात आल्या. पहिल्याच दिवशी सुमारे एक लाख वारक-यांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. दुसऱ्या दिवशी ही संख्या अधिक वाढली. शेवटच्या दिवशी तर अनेक दिंडया थांबून महाप्रसादासाठी रांगेत उभ्या होत्या.

परिते येथे उभारण्यात आलेल्या या सेवेच्या मंडपात फक्त नास्ताच नाही तर आरोग्य सेवाही दिली जात होती. विशेष म्हणजे कोणत्याही राजकीय किंवा प्रचाराच्या गोंधळाविना ही सेवा पूर्ण भक्तिभवाने, शिस्तबध्द आणि आत्मीयतेने केली जात होती. आरोग्य तपासणी स्टॉलवर थकलेल्या वारकऱ्यांची प्राथमिक तपासणी, पायदुखीवर उपचार आणि औषधांचे वाटप करण्यात येत होते. वडापाव भजीपाव स्टॉलवर अधिच चवदार पर्याय झणझणीत मिरचीसह उपलब्ध होता. सुंठ, विलायची मिश्रीत गरमागरम चहा वारकऱ्यांना सुखावणारा होता. तर फळे पाणी बाटलीबंद पाणी सोबत घेऊन जात प्रत्येक वारकरी या महाभोजन यज्ञाचे कौतुक करत होता.
वारकऱ्यांमध्ये आम्ही पांडूरंग पाहतो
वारीला येणारा वारकरी म्हणजे कष्टकरी शेतकरी. त्याच्या पायावर हात ठेवून सेवा केली तर पांडूरंग भेटतो. मंदिरात फुले वाहत असताना जर माणसातला देव न दिसला तर ती पूजा अपूर्णच राहते. इथे कोणी कार्यकर्ता नाही. सर्व माझे जीवाभावाचे भाऊ आहेत. मी स्वतः हाती झाडू घेतो, साफ सफाई करतो. इथे फोटोसाठी सेवा करत नाही, इथे घाम गळेपर्यंत काम करणारे हात असतात.
व्यवस्थापन, जिद्द आणि संयोजनाचे उत्तम उदाहरण
हा उपक्रम केवळ भावनिक नव्हे तर व्यवस्थापन कौशल्याचाही आदर्श होता. पहाटे ३.३० वाजता पहिली दिंडी पोहचते त्याआधी ५ हजार वडे, भजी तयार ठेवणे, ५० हजार भाविकांचा नास्ता एकाच वेळी पुरविणे, त्यातच आरोग्य सेवा व स्वच्छता हे सहज शक्य नाही. चारशे ते पाचशे कार्यकर्त्यांची टीम जे स्वतःच स्टॉलवर उभे राहतात, स्वयंपाकात मदत करतात, मंडपातच झोपतात आणि वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू पाहून समाधान मानतात हाच या उपक्रमाचा आत्मा असल्याचे खासदार नीलेश लंके यांनी यावेळी बोलताना सांगितले.
राजकारणाला नाही म्हणत भक्तीचाच स्वीकार !
वारकऱ्यांच्या भोळ्या श्रध्देमध्ये राजकारणाची पेरणी होऊ नये याची खबरदारी घेत खा. लंके यांनी स्पष्टपणे सांगितले की, मी इथे फक्त पांडूरंगाचा भक्त आहे. राजकीय भाष्य करायचे नाही. इथे मी कोणताही पदाधिकारी नाही, फक्त एक सेवक आहे. माझी प्रार्थना फक्त एकच आहे की शेतकऱ्यांना, सर्वसामान्य माणसाला सुख लाभो, बेरोजगारांना रोजगार मिळो आणि गोरगरीबांच्या चेहऱ्यावर हसू उमटावे.