आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. एकीकडे मनोज जरांगे पाटील यांचा उपोषणाचा चौथा दिवस आहे तर दुसरीकडे महाराष्ट्रातील सर्वच मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत.
आता सत्ताधारी गटातील अजित पवार गटातील आ. निलेश लंके यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही, तर हिवाळी अधिवेशन बंद पाडण्याचा इशारा सरकारलाच दिला आहे.
विशेष म्हणजे आ. लंके हे सध्या सत्तेत आहेत. त्यामुळे त्यांच्या या विधानामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे आता मराठा आरक्षणाच्या मुद्यावर सत्ताधारी आमदाराच आक्रमक झाल्याचे चित्र आता पाहायला मिळात आहे.
आरक्षण मिळाले नाही तर हिवाळी अधिवेशन बंद पाडू
सध्या राज्यभरात मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत आहे. मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी मराठा समाजाने राज्यातील जवळपास सर्वच गावांमध्ये नेत्यांना गावबंदी केलेली आहे.
अनेक ठिकाणी निदर्शने सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर मावळातील कार्ला येथेही मराठा समाजबांधव उपोषणाला बसले आहेत. यावेळी पारनेरचे आमदार निलेश लंके उपस्थित होते.
त्यावेळी निलेश लंके यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारला थेट इशारा दिला आहे. आरक्षण मिळाले नाही तर सर्व मराठा समाजाच्या आमदारांना सोबत घेऊन संसदेचे हिवाळी अधिवेशन बंद पाडू असा थेट इशाराच त्यांनी दिलाय.
एकीकडे पुढाऱ्यांना गावबंदी, पण आ. लंके यांना विरोध नाही
मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्याने राज्यभरातील गावोगावी नेते आणि मराठा आंदोलक यांच्यात वाद वाढत चालला आहे. अनेक ठिकाणी नेत्यांना मराठा समाजाच्या रोषालाही सामोरे जावे लागले.
मात्र, आ. निलेश लंके यांना विरोध झाला नाही. आ. निलेश लंके यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन त्यांनी मराठा समाजाच्या आंदोलकांशी संवाद साधला.
सर्व मराठा समाजाच्या आमदारांना सोबत घेऊन संसदेचे हिवाळी अधिवेशन बंद पाडू असा इशाराच येथून आ. लंके यांनी दिला.