Ahilynagar Politics News : चांगल्या मनाने, निस्वार्थ भावनेने काम केले तर त्याला निसर्गाची सूध्दा साथ मिळत असते. निळवंडेचे पाणी देणार हा शब्द जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी जनतेला दिलेला शब्द पूर्ण करून दाखवला आहे. आता पाण्याची चिंता करू नका उपलब्ध पाण्यावरती ऊस लागवड करा ऊस लागवडीसाठी सर्वतोपरी मदत विखे पाटील कारखान्याच्या माध्यमातून केली जाईल केली जाईल. हसून आणि आश्वासने देऊन जनतेची कामे होत नाहीत त्यासाठी प्रत्यक्ष काम करावे लागते असे प्रतिपादन विखे पाटील कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.
गणेश परिसरातील खडके वाके येथील निळवंडे पाण्याने भरलेल्या पाझर तलावाचे जलपूजन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रावसाहेब लावरे हे होते. यावेळी सरपंच सचिन मुरादे, दिपक गायकवाड जलसंपदा विभागाचे कैलास ठाकरे, महेश गायकवाड आदींसह विविध संस्थाचे पदाधिकारी, केलवड, आडगाव येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अजून बराच हिशोब मला पूर्ण करायचा आहे
यावेळी बोलतांना डाॅ.विखे पाटील म्हणाले, निळवंडेचे पाणी हे शेवटच्या शेतकर्याला देणे ही आपली जबाबदारी आहे आणि ती आपण पूर्ण करणार आहोत. गणेश परिसर कायमच विखे पाटील यांच्या पाठीशी उभा राहिला आहे. निवडणुकीच्या काळात राज्यातले आणि केंद्रातले लोक या ठिकाणी एकत्र आले पण जनतेने कायमचं विखे पाटील यांच्यावर विश्वास ठेवला. त्यांनी भाषणे सोडून आणि वैयक्तिक टीका सोडून काहीच केले नाही.श्री गणेश कारखान्याच्या माध्यमातून राजकारण करू नका. अजून बराच हिशोब मला पूर्ण करायचा आहे असे सांगत गणेश कारखाना सुरू करण्यासाठी जवळ पास शंभर कोटी खर्च केले तो कारखाना व्यवस्थित चालवा त्याचा वापर हा राजकारणासाठी करू नका सल्ला डाॅ सुजय विखे पाटील यांनी दिला.
मतदार संघ हा भयमुक्त आणि गुन्हेगार मुक्त
मंत्री विखे पाटील यांच्या माध्यमातून जलसंपदा विभागाचे काम लोकाभिमुख ठरत आहे. शिर्डी मतदार संघ हा भयमुक्त आणि गुन्हेगार मुक्त करणे हाच आपला ध्यास आहे. मंत्री विखे पाटील यांनी जिरायत भागासाठी सुरू केलेल्या साईगंगा योजनेचे नूतनीकरण करून ही योजना जलसंपदा विभागाच्या माध्यमातून पूर्ण क्षमतेने सुरु होणार असल्याची ग्वाही दिली.
शेती, दूध, पाणी, आणि रोजगारासाठी प्रयत्न
शिर्डी मतदारसंघात पुढील ५० वर्षाचा विचार करून शेती, दूध, पाणी, आणि रोजगारासाठी आपण प्रयत्न करत आहोत. जनतेच्या विश्वासाला विखे पाटील परिवार हा तडा जाऊ देणार नाही. आपले भविष्य उज्वल करण्याचे काम आपण करत आहोत. भाषणे करून गेले त्यांना जनतेने निवांत केले आहे. मी स्वतःला भाग्यवान समजतो की आजोबांनी पाझर तलाव बांधले, वडिलांनी त्यात पाणी आणले, आणि मी त्याचे पूजन करतो यासाठी मोठं भाग्य लागते आणि हे सर्व केवळ जनतेने दिलेल्या प्रेमामुळेच शक्य झाले आहे. आज शिर्डी मतदार संघामध्ये विविध विकास कामांच्या माध्यमातून काम उभे राहत आहे दूध उत्पादन दूध उत्पादकांसाठी पशुखाद्य प्रकल्प, कचरा मुक्त गाव योजना राबवण्यासाठी गोगलगांव या ठिकाणी सेंद्रिय खत उत्पादन प्रकल्प राबवला जाणार आहे.
भाव देण्याची जबाबदारी आमची
विखे पाटील कारखान्याच्या माध्यमातून प्रवरेच्या आणि विळद घाट येथील कृषी महाविद्यालय आणि कृषी विज्ञान केंद्र,बाभळेश्वर याठिकाणीहून दर्जेदार ऊस रोपे देऊन लागवडीसाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे हे प्रोत्साहन देताना एकरी उसाची उत्पादकता वाढीसाठी विशेष प्रयत्न हे या भागामध्ये केले जाणार आहे. तुम्ही ऊस लावा तो वाढवण्याची आणि तोडण्याची जबाबदारी सोबतच त्या ऊसाला उच्चांकी भाव देण्याची जबाबदारी ही आमची राहील असेही डॉ. विखे पाटील यांनी सांगितले.
राजकारण बाजूला ठेवा
राजकारण हे व्यक्ती केंद्रित करू नका. गणेश कारखाना जरूर चालवा परंतु त्याचा वापर राजकारणासाठी करू नका. गणेशच्या कर्मचाऱ्यांना भरभरून दिले पण त्यांनी विरोधात काम केले अशी खंत व्यक्त करतानाच मी दिलखुलास माणूस आहे मी गोड बोलत नाही परंतु जे बोलतो तेच करतो.आज अनेकांची दुकाने बंद झाल्याने विरोधक हे आपल्याकडे येतात पण या विरोधकांना कार्यकर्त्यांनी चांगले पारखून घ्या त्यांचा त्रास आपल्याला होता कामा नये ही जाणीवही ठेवा असाही सल्ला कार्यकर्त्यांना देत मंत्री विखे पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ऊस उत्पादकांसाठी उस लागवडीसाठी विशेष घोषणा करणार असल्याचेही सुवाच्च त्यांनी केले.