सर्व पुरावे असतानाही बुऱ्हानगर येथे भगत परिवाराचे मंगल कार्यालय तसेच वडगांव गुप्ता येथील गरीब मागासवर्गीय बांधवांच्या घरावर बेकायदेशीर ररित्या बुलडोझर फिरवून अन्याय केल्यासंदर्भात आपण संसदेत आवाज उठविणार असल्याचे खासदार नीलेश लंके यांनी सांगितले.
बुऱ्हानगर येथील भगत यांच्या मंगल कार्यालयाचे बांधकाम पाडण्यात आल्यानंतर वडगांव गुप्ता येथेही प्रशासनाच्या वतीने अतिक्रमण असल्याचे सांगत घरे जमीनदोस्त करण्यात आली. खा. नीलेश लंके यांनी उघडयावर पडलेल्या कुटूंबांची भेट घेत आपण त्यांच्या पाठशी उभे आहोत. संसदेत आवाज उठवू. थेट सर्वोच्च न्यायालयात हा विषय मांडता येईल का यासंदर्भात वकीलांशी सल्लामसलत करतो अशी ग्वाही खा. लंके यांनी दिली.

यावेळी नागरिकांशी संवाद साधताना खा लंके म्हणाले, तुमची घरे पाडल्यानंतर तुमच्यापेक्षाही अधिक दुःख आम्हाला झाले आहे. गरीबी काय असते हे मला माहीती आहे, आम्ही ते भोगलेले आहे.
खा. लंके पुढे म्हणाले, आज आपल्यावर वाईट काळ आला आहे. परंतू ज्यांच्यामुळे आपल्यावर ही वेळ आली आहे, त्यातून त्यांना सुख मिळणार नाही. त्यांनाही एक दिवस याच चरखामधून जावे लागणार आहे. या संकटातून आपण पुढे जाऊ. तुम्ही काळजी करू नका, मी तुमच्या सोबत आहे. मी तुमच्या कुटूंबातील आहे. तुमची दुःख मी देखील भोगलेले आहे. मी काही मोठया घरातून आलेलो नाही.
स्वार्थासाठी हिंदुत्वाच्या गप्पा !
बुऱ्हानगर येथील पालखीला ११०० वर्षांची परंपरा आहे. ती पालखीही त्यांनी बुडोझरखाली गाडली. आणि ते हिंदुत्वाच्या गप्पा मारत आहेत. तेथील देवीची कमान पाडण्यात आली. वडगांव गुप्तामध्ये मंदिर उध्वस्त करण्यात आले. केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी हे हिंदुत्वाच्या गप्पा मारत आहेत असा आरोप खा. लंके यांनी केला.
एक दिवस कायदा आपल्या बाजूने उभा राहील
या अन्यायाविरोधात आपण कायदेशीर लढाई करू. एक ना एक दिवस कायदा आपल्या बाजूने उभा राहणार आहे. कायद्याची चौकट सोडून कोणी काही करू शकत नाही. ही कायदेशीर लढाई आपण जिंकणार आहोत. ज्या अधिकाऱ्यांनी चुकीची कारवाई केली त्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यासाठी आपण पुढाकार घेणार असल्याचे खा. लंके म्हणाले.
मलाही तुरूंगात डांबण्याचा कट
घरे जमीनदोस्त होताना मला पाहवले नसते. त्यामुळे मी इकडे आलो नाही. मी दवाखान्यात दाखल होतो तरीही आलो असतो. त्यांना हे अपेक्षीत आहे की मी कुठेतरी आलो पाहिजे, माझ्यावर गुन्हे दाखल करून माझ्यासारख्यालाही तुरूंगात डांबण्याची त्यांची तयारी आहे. हा सर्व कट आहे असा गंभीर आरोप खा. लंके यांनी केला.
आमच्यासारख्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी गरीबांच्या घरांवर बुलडोझर
हा विषय मी संसदेमध्ये मांडणार आहे. थेट सुप्रिम कोर्टात हा विषय मांडता येईल का याविषयी वकीलांशी चर्चा करू. म्हातारी मेल्याचे दुःख नाही तर काळ सोकावता कामा नये. आमच्या सारख्या लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी गरीबांच्या घरांवर बुलडोझर फिरविण्यात आल्याचे लंके म्हणाले.
दबाव म्हणून तुम्ही घरांवर नांगर फिरवणार का ?
अधिकारी दबावामुळे कारवाई केल्याचे सांगत असले तरी अधिकाऱ्यांनी त्यांच्या अधिकारात ही कारवाई केली आहे. तुमच्यावर दबाव आहे म्हणून तुम्ही लोकांच्या घरावर नांगर फिरवणार का ? तुम्ही चुकीचे केले तुम्हाला फेडावे लागणार आहे. ज्यांनी करायला लावले त्यांनाही फेडावे लागणार आहे. आज माझे गोरगरीब लोक उघडयावर आहेत. त्यासाठी कायदेशीर लढाईच करावी लागणार असल्याचे खा. लंके यांनी ठामपणे सांगितले.
उत्तर प्रदेशातही अशी कारवाई
उत्तरप्रदेशात अशा पध्दतीने अन्याय करण्यात आला होता. न्यायालयाने संबंधितांना नुकसानभरपाई देखील देण्याचे आदेश दिले होते. दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती. शरद पवार यांच्या माध्यमातून मी संबंधितांची भेट घेणार असून त्यासाठी तुम्ही तुमच्याकडील पुरावे माइ-याकडे द्या.
बॅकवर्ड क्लास सोसायटीची जमीन
वडगांव गुप्ता येथील गट नंबर ५९१/१ या क्षेत्रात ४० ते ५० मागासवर्गीय कुटूंब ३० ते ३५ वर्षापासून राहत आहेत. तत्कालीन प्रांताधिकाऱ्यांनी ३ डिसेंबर १९६४ मध्ये बॅकवर्ड क्लास फामग सोसायटीसाठी या गटातील उत्तर बाजूचे ६१३ एकर २८ गुंठे इतके क्षेत्र दिलेले आहे. या कुटूंबांकडे आधार कार्ड, मतदार यादीत नाव, ग्रामपंचायतचे नळ कनेक्शन, वीजेचे मिटर या गोष्टीही असल्याचे तेथील नागरीकांचे म्हणणे आहे.