Thane Metro : ठाण्यातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे, ती म्हणजे ठाण्यात 29 किलोमीटर लांबीचा मेट्रो मार्ग विकसित होणार आहे. खरंतर राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर सारखा शहरांमध्ये मेट्रो सुरू झाली आहे आणि आता ठाण्यात सुद्धा मेट्रो सुरू होणार आहे. शहरात आगामी काळात रिंग रेल्वे मेट्रो सुरु होईल आणि यामुळे ठाणेकरांचा प्रवास वेगवान होणार आहे. शहरात 12 हजार 200 कोटी रुपयांचा वर्तुळाकार मेट्रो प्रकल्प विकसित केला जाणार असून या प्रकल्पाबाबत एक नवीन अपडेट हाती आली आहे. आज आपण याच प्रकल्पाबाबत महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत.
कसा असणार प्रकल्प?
ठाणे शहरात वर्तुळाकार मेट्रो प्रकल्प अंतर्गत 29 किलोमीटर लांबीचा नवा मेट्रो मार्ग तयार होणार आहे. यासाठी 12,200 कोटी रुपयांचा खर्च केला जाईल. यातील 26 किलोमीटर लांबीचा मार्ग हा जमिनीवरून राहणार आहे तसेच तीन किलोमीटर लांबीचा मार्ग भूमिगत राहणार आहे. या मार्गावर एकूण 22 स्टेशनं तयार होणार आहेत त्यापैकी दोन स्टेशनं जमिनीखाली राहतील. दरम्यान या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात वीस किलोमीटर लांबीचा मार्ग तयार केला जाणार असून यासाठी चौदाशे कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया राबवली जात असून ही प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे 1400 कोटी रुपयांची निविदा मंजुरीच्या अंतिम टप्प्यात पोहोचलेली आहे.

म्हणजेच येत्या काही दिवसात या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया पूर्ण होईल आणि त्यानंतर वर्क ऑर्डर दिले जातील आणि मग याचे काम सुरू होणार आहे. साधारणता 2029 पर्यंत या प्रकल्पाचे काम पूर्ण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या प्रकल्पाबाबत बोलायचं झालं तर या प्रकल्पाला राज्याची आणि केंद्राची मंजुरी मिळालेली आहे. तसेच वेळोवेळी या प्रकल्पाबाबत आढावा बैठक सुद्धा घेतली जात आहे. पहिल्या टप्प्यात रायला देवी ते बाळकुम नाका यादरम्यानचा 20 किलोमीटर लांबीचा मार्ग तयार होईल. वडवली, कावेसर या ठिकाणी या मेट्रो प्रकल्पाचे डेपो विकसित केले जाणार आहेत आणि याच्या बांधकामाचीही निविदा लवकरच पूर्ण होईल.
मेट्रो मार्गावरील स्थानके
शहरातील वर्तुळाकार मेट्रो मार्गावर वागळे इस्टेट, रोड नं. 22, लोकमान्य नगर, पोखरण रोड नं. 1, पोखरण रोड नं. 2, ग्लँडी अल्वारिस रोड, हिरानंदानी मिडोज, हिरानंदानी इस्टेट, कोलशेत, बाळकुम, राबोडी, ठाणा कॉलेज रोड, ठाणे स्थानक ही महत्त्वाची स्थानके विकसित केली जाणार आहेत. यामुळे या परिसरातील विकासाला चालना मिळेल अशी आशा आहे.