Agriculture News : शेतकऱ्यांसाठी शासनाकडून कायमच वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. या अशा शासकीय योजनेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच जीवनमान उंचावण्याचा शासनाचा मानस असतो. दरम्यान शेतकऱ्यांना वेगवेगळ्या बँकांकडून कर्ज देखील दिल जात. या कर्जाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेती कसण्यासाठी सोयीचे होते.
दरम्यान, आता शेतकऱ्यांना एका विशिष्ट नगदी पिकाच्या शेतीसाठी एकरी एक लाखाचे कर्ज मिळणार आहे. आता तुम्ही म्हणत असाल नेमकं हे पीक कोणत आहे. तर आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, रेशीम शेतीसाठी एकरी एक लाखाचं कर्ज शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे. मात्र, हे कर्ज उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाच उपलब्ध होणार आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, उस्मानाबाद जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रेशीम शेतीसाठी सहजतेने कर्ज उपलब्ध व्हाव या अनुषंगाने पुढाकार घेतला आहे. विशेष बाब अशी की, आता जिल्ह्यातील सर्व बँका शेतकऱ्यांना एकरी एक लाख रुपये रेशीम शेतीसाठी कर्ज देणे हेतू सकारात्मक असल्याचे सांगितले जात आहे. निश्चितच यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.
खरं पाहता जिल्हात रेशीम शेतीचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे. विशेष म्हणजे यातुन शेतकऱ्यांना चांगली कमाई देखील होत आहे. यंदाच्या वर्षात जिल्ह्यात दहा हजार एकर क्षेत्रावर रेशीम शेतीचे टार्गेट ठेवण्यात आला आहे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय देखील तत्पर आहे. अशातच आता जिल्हाधिकारी महोदय यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील बऱ्याचशा बँका शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी पुढे सरसावणार आहेत.
रेशीम शेतीतून एका एकरात चार ते पाच लाखांची कमाई शेतकऱ्यांना होते. निश्चितच हे खरं असलं तरी देखील शेतकऱ्यांना रेशीम शेतीसाठी सुरुवातीला भांडवल लागते. रेशीम शेतीसाठी महत्त्वाचं म्हणजे शेड बांधकामासाठी पैसे लागतात. जवळपास दीड लाखाचा खर्च यासाठी येतो. मात्र अनेक शेतकऱ्यांकडे यासाठी पुरेसे पैसे उपलब्ध नसल्याने ते रेशीम शेतीकडे इच्छा असूनही वळू शकत नाही.
याच हेतूने जिल्हाधिकारी महोदय यांनी जिल्ह्यातील बँकांच्या अधिकार्यांसमवेत एक महत्त्वाची बैठक घेतली होती. या बैठकीत रेशीम शेतीसाठी एकरी एक लाख रुपयांचे कर्ज शेतकऱ्यांना दिले जावे असा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. या प्रस्तावावर अनेक बँकांनी सहमती दर्शवली आहे.
तर काही बँका पुढे जाऊन सकारात्मक निर्णय घेणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी महोदय यांनी दिली आहे. निश्चितच उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रेशीम शेतीसाठी आर्थिक मदत मिळाल्यास जिल्हा लवकरच रेशीम हब बनेल आणि यामुळे कृषी क्षेत्रात एक अमुलाग्र असा बदल होईल आणि शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावेल यात तीळमात्र देखील शंका नाही.