Ahmednagar Rain Alert : राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस आणि गारपिटीने अक्षरशः थैमान माजवले आहे. या बदललेल्या हवामानाचा सर्वाधिक फटका मात्र शेतकऱ्यांना बसत आहे. यामुळे शेती पिकांची मोठी नासाडी झाली असून शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा भ्रूदंड बसला आहे.
पुणे, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, सांगली, सातारा, बीड या जिल्ह्यात तर गारपिटीने अक्षरशः थैमान माजवले होते. नासिक जिल्ह्यात तर तब्बल 50 ते 60 गावात गारपीट झाल्याची नोंद आहे. अहमदनगर जिल्ह्यातही बहुतांशी भागात गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे.
रब्बी हंगामातील काढणी योग्य पिके, कांदा तसेच फळबाग पिकांचे यामुळे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जोपासलेले पिके या अवकाळीने हिरावून घेतली आहेत. दरम्यान आता राज्यात पुन्हा एकदा पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
यावेळी तर वादळी पावसाची शक्यता असल्याचे मत हवामान विभागाने व्यक्त केले आहे. तसेच उन्हाचा देखील चटका वाढणार आहे. म्हणजेच दिवसा प्रचंड ऊन आणि सायंकाळी वादळी पाऊस पडेल असा हवामान अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हे पण वाचा :- रेशन कार्डचा फॉर्म कसा भरायचा? पहा स्टेप बाय स्टेप प्रोसेस; Ration Card फॉर्मही डाउनलोड करा !
कोणत्या जिल्ह्यात पडणार पाऊस?
हवामान विभागाने दिलेल्या बहुमूल्य माहितीनुसार, उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नाशिक तसेच पश्चिम महाराष्ट्रातील अहमदनगर, सांगली, सोलापूर या जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज आहे. तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, लातूर, नांदेड आणि विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या भागातही वादळी पावसाची शक्यता आहे.
एकंदरीत मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने जारी केला आहे. यामुळे संबंधित जिल्ह्यातील नागरिकांना तसेच शेतकऱ्यांना अधिक सजग आणि सतर्क राहण्याची आवश्यकता आहे.
वास्तविक, गेल्या महिन्यात आणि या चालू महिन्यात आत्तापर्यंत झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शिवाय आता पुढील काही दिवस राज्यात आणखी पाऊस पडणार असा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे यामुळे निश्चितच शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.