Explained : निलेश लंके राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष होणार ! ही आहेत चार कारणे

Published on -

Explained : मुळची राष्ट्रवादी समजल्या जाणाऱ्या, शरद पवार पक्षाचा 26 वा वर्धापन दिन नुकताच साजरा करण्यात आला. या वर्धापनदिनात प्रदेशाध्यक्षपदावरुन नाराजीनाट्य रंगले. मला प्रदेशाध्यक्षपदावरुन मुक्त करा, असं जयंत पाटलांनी भर कार्यक्रमात सांगितल्यानंतर चर्चा सुरु झाल्या. राष्ट्रवादीच्या जुन्या कार्यकर्त्यांनी जयंत पाटलांच्या या निर्णयानंतर घोषणाबाजी करत भावुक वातावरण तयार केले. खरं तर, या कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आला. रोहित पवार- जयंत पाटील यांच्यातील शितयुद्ध पुन्हा एकदा अधोरेखित झाले. कारण कार्यक्रमानंतर या दोन्ही नेत्यांनी मीडियाला दिलेल्या बाईटमध्ये या शितयुद्धावर शिक्कामोर्तब झाले. आता खरा प्रश्न आहे, तो हा की, शरद पवार प्रदेशाध्यक्ष बदलतील का? प्रदेशाध्यक्ष बदलला, तर कुणाला संधी मिळेल? प्रदेशाध्यक्षपदासाठी नगर दक्षिणेचे खा. निलेश लंके यांचेही नाव अचानक समोर येऊ शकते, असं कुणी म्हटलं तर त्यावर विश्वास बसेल का? नाही ना…? पण हे खरं आहे. खा. निलेश लंके यांनाही प्रदेशाध्यक्षपदाची लाँटरी लागू शकते. ती कशी..? याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट.

साधारणः 2017- 18 सालापासून जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडीच्या सत्तेची अडीच वर्षे, त्यानंतर महायुती सरकारची अडीच वर्षे व त्यापूर्वीची दोन वर्षे असा त्यांच्या प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यकाळ आहे. मात्र पाटलांच्या याच कार्यकाळाबाबत त्यांच्याच पक्षातील युवा नेते रोहित पवारांनी अनेकदा उघड नाराजी अनौपचारिक रितीने बोलून दाखवली. नव्या चेहऱ्यांना संधी द्या… हे वाक्य रोहित पवारांनी आपल्या अनेक भाषणातून शरद पवारांना बोलून दाखवले आहे. आताही राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनात जयंत पाटलांनी या शितयुद्धाला कंटाळूनच प्रदेशाध्यक्षपदावर पाणी सोडण्याची तयारी केली असल्याचे सांगितले जाते. जयंत पाटलांच्या या निर्णयानंतर राष्ट्रवादीच्या सच्च्या कार्यकर्त्यांनी मात्र, पाटलांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. कार्यकर्त्यांचा मूड पाहून शरद पवारांनी सर्वांशी विचार करुन निर्णय घेऊ, असे टिपीकल उत्तर देत या चर्चांना पूर्णविराम दिला. परंतु यावेळी जयंत पाटील- रोहित पवार वाद वाढल्याने किंवा जयंत पाटलांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा होऊ लागल्याने राष्ट्रवादीला लवकरच नवा प्रदेशाध्यक्ष मिळेल, अशी शक्यता वाढली आहे.

जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्ष म्हणून सात वर्षे संधी मिळाली. राष्ट्रवादीतील तरुण नेतृत्वाला संधी मिळावी, यासाठी आमदार रोहित पवार यांचा आग्रह वारंवार दिसला आहे. पवार आणि पाटील यांच्यातील सुप्त संघर्ष ‘राष्ट्रवादी’त वाढताना दिसत आहे. जयंत पाटील यांनी पुण्यातील राष्ट्रवादीच्या मेळाव्यात पदापासून बाजूला होत असल्याचा सूर लावला, तेव्हा कार्यकत्यांकडून ‘नाही नाहीं’च्या घोषणा देण्यात आल्या. कार्यकत्यांच्या विरोधामुळे पाटील यांना त्यांचे राजीनामास्त्र म्यान करावे लागले; तरी पक्षातील एक गट त्यांच्या राजीनाम्यासाठी आग्रही आहे. दुसरीकडे, मेळाव्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी जयंत पाटील यांचा राजीनामा वगैरे आला नसल्याचा दावा प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. ‘पाटील यांनी असे काही पत्र दिलेले नाही किंवा त्यांनी तसे सांगितलेले नाही, असे त्या म्हणाल्या. परंतु पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा वाढल्या असल्याने ते लवकरच राजीनामा देतील, असेही सांगितले जात आहे.

आता या सगळ्या गदारोळानंतर राष्ट्रवादीचा नवा प्रदेशाध्यक्ष कोण, या चर्चा सुरु झाल्या आहेत. रोहित पवार म्हणतात, तसा राष्ट्रवादीचा तरुण चेहरा कोण? याची शोधाशोध सुरु झाली आहे. शिवाय शरद पवार व सुप्रिया सुळे यांच्या जवळच्या माणसांच्या नावाचीही चर्चा सुरु झाली आहे. त्यात माजी मंत्री शशिकांत शिंदे, मराठवाड्याचे मराठा नेते राजेश टोपे, खा. अमोल कोल्हे, रोहित पवारांच्या जवळचे नेते सुनील भुसारा, ही नावे समोर आली आहेत. या चार नावांसोबतच पाचवे आणि शाँकींग नावही समोर आले आहे, ते म्हणजे खा. निलेश लंके यांचे….

नगर दक्षिणेचे खा. निलेश लंके यांचे नावही प्रदेशाध्यक्ष पदाच्या शर्यतीत अचानक येऊ लागले आहे. राष्ट्रवादीचा एक गट व लंके यांचे कार्यकर्तेही यासाठी आग्रही असल्याचे समजते. तसं पाहिलं गेलं तर, आ. रोहित पवार हे निलेश लंके यांच्या नावाला नक्कीच समर्थन देणार नाहीत, परंतु खा. सुप्रिया सुळे व शरद पवार यांच्यासोबत असलेले संबंध निलेश लंके यांना प्रदेशाध्यक्ष बनवतील, असे सांगितले जात आहे. निलेश लंके प्रदेशाध्यक्ष का होतील, याची काही कारणेही देता येतात…

पहिले कारण पवारांशी जवळीक

निलेश लंके हे पहिल्यांदा राष्ट्रवादीचेच आमदार होते. परंतु पक्षात दुफळी पडल्यानंतर त्यांनी काही काळ अजित पवार गटात जाणे पसंत केले. सत्तेत राहून विकासकामे केल्यानंतर लोकसभा लढविण्याच्या महत्त्वाकांक्षेने त्यांनी पुन्हा आमदारकीचा राजीनामा देत, शरद पवार गटाचा रस्ता धरला. विशेष म्हणजे, खासदार होऊन त्यांनी विखेंचा पराभव करण्याचे शरद पवारांचे स्वप्नही पूर्ण केले. विखे- पवार वाद हा महाराष्ट्राला सर्वश्रूत आहे. त्यामुळे डाँ. सुजय विखेंना पराभूत केल्यानंतर निलेश लंकेंची राष्ट्रवादीतील क्रेझ वाढली. शरद पवार व खा. सुप्रिया सुळे यांच्या अगदी जवळ जाण्याची संधी लंके यांनी साधली. गेल्या सात-आठ महिन्यांत लंके हे पवार कुटुंबाच्या गळ्यातील ताईत झाले आहेत.

दुसरे कारण मुरब्बी राजकारणी

निलेश लंके हे आमदार व लगेच खासदार झाले. परंतु या सहा-सात वर्षांच्या काळात त्यांच्यातील मुरब्बीपणा सर्वांनी पाहिला. आक्रमक स्वभाव, लाघवी भाषणशैली, सामान्यांची नस ओळखण्याची कला, या गुणांमुळे लंके महाराष्ट्रातील चर्चेतील व्यक्तीमत्त्व झाले आहेत. महायुतीच्या सत्ताकाळात, अजित पवारांसोबत राहून मतदारसंघातील विकासकामांसाठी कोट्यवधींचा निधी मिळवणे, त्यानंतर लोकसभा लढविण्यासाठी पुन्हा शरद पवारांकडे येऊन खासदारकी मिळवणे, हा त्यांच्या राजकारणातील मुरब्बीपणा समजला जातो. त्यांचा हाच मुरब्बीपणा त्यांना प्रदेशाध्यक्षपदापर्यंत घेऊन जाईल, असे सांगितले जात आहे.

तिसरे कारण सर्वसमावेशक चेहरा

राष्ट्रवादीत सध्या रोहित पवार व जयंत पाटील असे दोन गट असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे शशिकांत शिंदे, सुनील भुसारा, राजेश टोपे यापैकी कुणालाही प्रदेशाध्यक्षपद सांभाळणे सोप्पे असणार नाही. त्याऊलट निलेश लंके हे, ना रोहित पवार समर्थक आहेत, ना जयंत पाटील समर्थक आहेत. निलेश लंके हे फक्त शरद पवार व सुप्रिया सुळे समर्थक आहेत. शिवाय, मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला राजेश टोपे हेच जबाबदार असल्याच्या चर्चा होत्या. त्यामुळे ओबीसीचा एक गट राजेश टोपे यांच्यामुळे नाराज होऊ शकतो, असे सांगितले जात आहे. सुनील भुसारा हे आदीवासी समाजातून येतात. परंतु ते रोहित पवार समर्थक असल्याचे सांगितले जाते त्यामुळे सहाजिक जयंत पाटील गट त्यांना अॅक्सेप्ट करील का? हा प्रश्न आहे. शशिकांत शिंदे किंवा डाँ. अमोल कोल्हे यांच्याबाबतही असेच काहीसे आहे. त्यामुळे सर्वसमावेशक चेहरा म्हणून खा. निलेश लंके यांचे प्रदेशाध्यक्षपदासाठी अचानक नाव येऊ शकते, असे सांगितले जात आहे.

चौथे कारण पवारांचा विश्वास

राष्ट्रवादीचा वर्धापन दिन झाल्यानंतर शरद पवार अचानक नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले. आपल्या वैयक्तीक दौऱ्यात त्यांनी नगर शहर, राहुरी, श्रीरामपूर येथे अचानक भेटी देत कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेतल्या. या संपूर्ण दौऱ्यात निलेश लंके हे त्यांच्यासोबत सावलीसारखे राहिले. जयंत पाटलांचे राजीनामा अस्त्र व लगेच शरद पवारांचा अहिल्यानगर दौरा या दोन्ही घटना अनपेक्षित घडल्या. कदाचित निलेश लंके यांची जिल्ह्यातील चाचपणी करण्यासाठी शरद पवार या दौऱ्यावर आले असतील का? असाही प्रश्न पडतो. मुळात, शरद पवारांच्या ओठावर काय व मनात काय? हे कुणालाच समजत नाही. परंतु त्यांचा अहिल्यानगर दौरा नक्कीच काहीतरी वेगळ्या चाचपणीसाठी असेल, असे सांगितले जात आहे. त्यामुळेच निलेश लंके यांच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या संधी वाढल्या आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News