Explained : लोकसभा व त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत, विखे-थोरात या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांमध्ये जुगलबंदी रंगली. या दोन्ही नेत्यांमध्ये ‘बदला पॅटर्न’ दिसला. थोरात व विखे या दिग्गज घराण्यातील तिसऱ्या पिढीचा संघर्षही महाराष्ट्राने पाहिला. डाँ. सुजय विखे यांनी आपला लोकसभेतील पराभवाचा बदला, विधानसभेला पूर्ण केला. थोरातांची 40 वर्षांची एकहाती व अभेद्य सत्ता, 40 दिवसांत मोडीत काढली. परंतु त्यानंतर पुन्हा एक धक्कादायक बातमी समोर आली. संगमनेर व प्रवरा या दोन्ही कारखान्याच्या निवडणुका या नेत्यांनी बिनविरोध केल्या. हा जिल्ह्यासाठी नव्हे तर, राज्यासाठीही सुखद धक्का ठरला. परंतु आता पुन्हा एकदा या दोन्ही नेत्यांमध्ये फिस्कटलंय… थोरातांचे मुळ गाव असलेल्या, संगमनेर तालुक्यातील जोर्वे या गावाच्या निमित्ताने, या दोन्ही नेत्यांची जुगलबंदी पुन्हा सुरु झाली. या दोन्ही नेत्यांच्या समर्थकांनी आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीपूर्वी आपापली ताकद दाखविण्याचा प्रयत्न सुरु केल्याने, या विषयाची चांगलीच चर्चा रंगली.
तीन वर्षांपूर्वी म्हणजेच डिसेंबर 2022 साली संगमनेर व राहाता तालुक्यातील काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकांत या थोरात व विखे या दोन्ही नेत्यांनी आपापले गड राखल्याचा दावा, त्यावेळी केला. परंतु थोरातांचे मुळ गाव असलेल्या संगमनेर तालुक्यातील जोर्वे ग्रामपंचायतीच्या संरपंच म्हणून, विखे गटाच्या सरपंच प्रीती दिघे या निवडून आल्या. सरपंच जरी विखे गटाच्या निवडून आल्या असल्या तरी, बहुतांश सदस्य हे थोरात गटाचे असल्याने ही ग्रामपंचायत गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने चर्चेत राहिली. थोरात व विखे गटाचे कायम मतभेद दिसले. विशेष म्हणजे, ही ग्रामपंचायत संगमनेर तालुक्यात असली तरी, ती विखेंच्या मतदारसंघात येते. त्यामुळे या दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांचे, येथे अजिबात जमत नाही.

दोन दिवसांपूर्वी, या ग्रामपंचायतीवरुन पुन्हा विखे-थोरात समर्थकांत वाद झाले. मागील तीन वर्षापासून जोर्वे ग्रामपंचायतीत लाखोंचा भ्रष्ट्राचार झाल्याचा आरोप थोरात गटाने केला. वेळोवेळी आंदोलने करूनही प्रशासनाने दखल घेत नसल्याने गुरुवारी 26 तारखेला थोरात गटाच्या उपसरपंचासह इतर सदस्यांनी संगमनेर पंचायत समितीवर घेराव आंदोलन केले. ग्रामपंचायतीतील भ्रष्ट्राचाराची एक महिन्यामध्ये चौकशी न झाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला. याच वेळी सत्ताधारी विखे गट सरपंचासह तेथे आला. त्यांनीही आरोप करणाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी करत, पंचायत समितीत जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे वाद व तणाव वाढला. पोलिसांना मोठा बंदोबस्त तैनात करावा लागला.
बोगस बिले तयार करणे, न झालेली कामे दाखवून अनुदान लाटणे, बोगस वस्तू खरेदी दाखवणे, शेतकऱ्यांनी केलेल्या रस्त्यांची कामे दाखवून बिले काढणे, असे प्रकार सत्ताधारी करत असल्याचा आरोप थोरात गटाने केला आहे. रस्त्यांच्या कामात तब्बल 19 लाखांचा अपहार केल्याचा आरोप थोरात गटाने केला आहे. या प्रकरणाची तक्रार करुनही राजकीय दबावामुळे चौकशी होत नाही, असं थोरात गटाचं म्हणणं आहे. तर विखे गटाने केलेले आरोपही विचार करायला लावणारे आहे. 40 वर्षे ज्यांना सत्तेचा वापर विकासासाठी करता आला नाही, ते हे बिनवुडाचे आरोप करत असल्याचं विखे गटाचं म्हणणं आहे. विखे गटाने दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, ग्रामपंचायत कार्यालय, ट्रॅक्टर ट्रॉली, टँकर, ब्लोअर, रुग्णवाहिका, दवाखाना, अमरधाम रस्ता, पथदिवे, सौरदिवे, गटारी, रोहित्र, पाणीपुरवठा, वैयक्तिक लाभाच्या योजना, अशी विविध प्रकारची विकासकामे झाली आहे. गावातील मुख्य चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे काम सुरू आहे.
परंतु, हे विरोधकांना पाहवत नाही. त्यामुळे भ्रष्टाचाराचा आरोप करुन समाज माध्यमांवर आम्हांला बदनाम करण्याचे काम करत आहेत. मात्र हे आम्ही कदापिही सहन करणार नाही. इतकी वर्षे जनतेला कायम वेठीस ठेवलं आता हे बंद करा. प्रत्येक कामात अडथळा आणणे, ग्रामसेवकांना अरेरावीची भाषा वापरणे, आणि एका सदस्याने तर ग्रामपंचायतची विहीर बळकावण्याचा प्रयत्न केला. हे मुद्दे आम्ही बोललो म्हणून आम्ही भ्रष्टाचार केला म्हणून बदनामी करु नका. आमच्यावर केलेले आरोप सिद्ध झाले नाही, तर ज्यांनी आरोप केले त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सत्ताधारी गटाने पंचायत समिती प्रशासनाला दिलेल्या निवेदनातून केली आहे.
जोर्वे ग्रामपंचायतीतील भ्रष्ट्राचार व बदनामीचा मुद्दा सध्या संगमनेर तालुक्यातील सर्वात हाँट विषय झाला आहे. आ. अमोल खताळ त्यांच्या पद्धतीने खिंड लढवत असताना आता थोरात- विखे गट आमनेसामने आला आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वीची ही रंगीत तालिम तर नाही ना? असा प्रश्न सामान्यांना पडू लागला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत केलेली अती आत्मविश्वासाची चूक थोरात गट नक्कीच करणार नाही. त्यामुळेच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी तब्बल सहा महिन्यांपासून तो अँक्टीव्ह झालाय. दुसरीकडे विखे-खताळ गटानेही निवडणूक हलक्यात न घेता, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची पूर्वतयारी केली आहे, असेच या मुद्यावरुन दिसत आहे.