Gold Rules : भारतात फार पूर्वीपासून गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. यातीलच एक लोकप्रिय पर्याय म्हणजे सोनं आणि चांदी मधील गुंतवणूक. अनेकजण सोन्यात गुंतवणूक करतात. सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांना गेल्या काही वर्षांमध्ये चांगले रिटर्न सुद्धा मिळाले आहेत.
महत्वाची बाब अशी की सोन्याला केवळ गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातूनच नाही तर तर भावनिकदृष्ट्याही मोठे महत्त्व आहे. हिंदू सनातन धर्मात सोन्याला अगदी पवित्र समजले जाते. हिंदू धर्मात शुभकार्यात सोने खरेदीला विशेष महत्त्व दाखवले जाते.

आपल्याकडे लग्न, सण, नामकरण सोहळा यांसारख्या शुभ प्रसंगी सोन्याचे दागिने बनवण्याची प्रथा आहे. गुढीपाडवा दिवाळी अक्षय तृतीया यांसारख्या सणांना सोन्याची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते.
मात्र, जर तुम्हीही सोन्यात गुंतवणूक करण्याच्या तयारीत असाल किंवा तुम्हाला सोन्याचे दागिने बनवायचे असतील तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे. आज आपण भारतीय नागरिकाला घरात किती सोने ठेवता येते? याबाबत भारतीय आयकर विभागाचे नियम काय आहेत याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.
नियम काय सांगतात ?
नियमांनुसार, भारतात कोणत्याही कागदपत्राविना विवाहित महिला 500 ग्रॅम, अविवाहित महिला 250 ग्रॅम आणि पुरुष 100 ग्रॅमपर्यंत सोने घरात ठेवू शकतात. या मर्यादा प्रत्येक व्यक्तीवर स्वतंत्रपणे लागू होतात.
म्हणजेच एका कुटुंबात दोन विवाहित महिला असल्यास, त्या एकत्र 1 किलोपर्यंत सोने कायदेशीररीत्या बाळगू शकतात. याचा अर्थ असा होत नाही की लग्न झालेल्या महिलांना 500 ग्रॅम पेक्षा जास्त सोना ठेवता येणार नाही.
तर याचा अर्थ असा आहे की या ठराविक मर्यादेपेक्षा अधिक प्रमाणात सोने आढळल्यास, त्याचा उत्पन्न स्रोत स्पष्ट करणं गरजेचे राहणार आहे. म्हणजेच या लिमिट पेक्षा जर जास्त सोने तुमच्याकडे असेल तर तुम्हाला योग्य पावत्या, खरेदीचे पुरावे आणि आयकर भरल्याची योग्य ती माहिती सांगावी लागणार आहे.
जर तुमच्याकडे सर्व आवश्यक पुरावे असतील तर तुम्हाला घाबरण्याची काही गरज नाही. मात्र, जर पुरावे नसतील तर आयकर विभागाकडून चौकशी किंवा छापे पडण्याची शक्यता असते.
सोने खरेदी करताना पॅन कार्ड द्यावे लागते
नियमानुसार जर दोन लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीचे सोने खरेदी करायचे असेल तर अशा खरेदीवेळी खरेदीदाराला पॅन कार्ड देणे बंधनकारक आहे.
तसेच दहा हजारापेक्षा जास्त रक्कमेचा व्यवहार बँकेद्वारेच करणे सुद्धा आवश्यक आहे. या नियमानुसार सोनं खरेदी करताना पावती घ्यायला हवी, कारण हीच पावती भविष्यातील कायदेशीर अडचणीत तुमचं संरक्षण करणार आहे.