Maharashtra Expressway : जून महिन्याचा पहिला पंधरवडा उलटला आहे. मात्र अजूनही राज्यातील अनेक भागांमध्ये अपेक्षित पाऊस झालेला नाही. गेल्या महिन्यात राज्यातील काही ठिकाणी पावसाने हाहाकार माजवला होता. पण जून महिन्यात पावसाचे प्रमाण कमी राहिले आहे.
दरम्यान येता काही दिवसांनी राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी पावसाचा जोर वाढलाय. विशेषतः कोकणात पावसाचा जोर वाढू लागलाय आणि याच अनुषंगाने महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा घाट मार्ग काही वाहनांसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

राज्यात पावसाचा जोर वाढल्याने पश्चिम महाराष्ट्रात आणि कोकणातील अनेक भागांत पूरस्थिती आणि दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत. यामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जोडणारा एक महत्त्वाचा घाट मार्ग आता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
हा घाट मार्ग वाहतुकीसाठी झाला बंद
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-भोरमार्गे कोकणातील महाडला जोडणारा वरंध घाट पावसाळा संपेपर्यंत म्हणजेच पुढील तीन महिन्यांसाठी अवजड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
खरंतर हा घाट मार्ग पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जोडणारा एक महत्त्वाचा मार्ग आहे. पण पावसाळ्यात हा घाट मार्ग फारच अडचणीचा ठरतो कारण की पावसाळ्याच्या दिवसांमध्ये या घाटात रस्ता खचणे, दरडी कोसळणे, माती वाहून जाणे यांसारख्या घटनांचा धोका वाढतो.
दरम्यान याच साऱ्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून हा घाट मार्ग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी हा घाट पुढील तीन महिन्यांसाठी अवजड वाहनांकरीता पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
तर हलक्या वाहनांची सुद्धा वाहतूक बंद होईल
महत्त्वाची बाब म्हणजे पुणे आणि कोकणाला जोडणारा हा घाटमार्ग फक्त अवजड वाहनांसाठी बंद राहील असे नाही तर हवामान खात्याचा रेड किंवा ऑरेंज अलर्ट जारी झाल्यास हलक्या वाहनांची वाहतूकही रोखण्यात येणार आहे.
खरेतर, सध्या या घाटात रस्त्याचे रुंदीकरणाचे काम सुरू असून त्यामुळे रस्त्याची अवस्था खराब झाली आहे. वरंध घाट मार्गाबाबत बोलायचं झालं तर निसर्गसौंदर्याने नटलेला सुमारे 10 किमी लांबीचा हा घाट पावसाळ्यात अधिकच धोकादायक ठरतो.
याच कारणांमुळे प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन पुढील तीन महिन्यांसाठी हा घाट मार्ग अवजड वाहनांसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.
सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने हा निर्णय घेतला असून नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन सुद्धा जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून यावेळी करण्यात आले आहे.