Maharashtra News : 2020 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबादमधील साबरमती रिव्हरफ्रंट ते केवडिया यादरम्यान देशातील पहिली सी प्लेन सेवा सुरू केली होती. दरम्यान, आगामी काळात देशभरातील 150 महत्त्वाच्या मार्गांवर ही सी प्लेन सेवा सुरू केली जाणार आहे.
पर्यटनाला चालना मिळावी आणि दुर्गम भागात हवाई संपर्क स्थापित व्हावा या अनुषंगाने देशभरातील विविध ठिकाणी सी प्लेन सेवा सुरू केली जाणार आहे. महत्त्वाची बाब अशी की यामध्ये महाराष्ट्रातील आठ ठिकाणांचा समावेश करण्यात आला आहे.

केंद्रातील सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या उड्डाण 5.5 योजनेत हेलिकॉप्टर आणि सी प्लेन सेवा समाविष्ट करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडून देशभरातील 150 महत्त्वाच्या मार्गांवर सी प्लेन सेवा सुरू करण्यात येणार आहे. केरळ, आंध्र प्रदेश, अंदमान निकोबार , महाराष्ट्र आणि लक्षद्वीप या राज्यांमध्ये सुरुवातीच्या टप्प्यात ही सेवा सुरू केली जाणार आहे.
कशी असणार सी प्लेन सेवा
देशभरातील 150 महत्त्वाच्या ठिकाणी असणाऱ्या जलाशयातून नद्यांमधून तसेच बॅकवॉटर येथून ही सी प्लेन सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पासाठी कॅनडामधील डे हॅवीलंड एअरक्राफ्ट कंपनीची विमाने वापरले जातील अशी सुद्धा माहिती समोर येत आहे.
देशातील इंडिगो आणि पवनहंस या कंपन्यांच्या माध्यमातून ही सी प्लेन सेवा सुरू केली जाणार आहे. महत्वाची बाब म्हणजे या सेवेचे तिकीट दर हे सर्वसामान्यांना परवडतील असे राहू शकतात.
या सेवेचे तिकीट दर साधारणता दीड ते दोन हजार रुपये असू शकतात. महत्त्वाचे म्हणजे याला उडान योजनेअंतर्गत प्रोत्साहन सुद्धा दिले जाणार आहे. डिसेंबर अखेरपर्यंत ही सेवा सुरू होऊ शकते असा दावा करण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील या आठ ठिकाणी सुरु होणार सी प्लेन सेवा
देशभरात सुरू केल्या जाणाऱ्या सी प्लेन सेवांमध्ये महाराष्ट्रातील आठ ठिकाणांचा समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास महामंडळ म्हणजेच एमएडीसी यांच्याकडून सातारा जिल्ह्यातील वाई मधील धोम धरण,
नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरण, नागपूर जिल्ह्यातील खिंडसी धरण, बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथील कोराडी धरण, पुणे जिल्ह्यातील पवनानगर येथील पवना धरण, नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी येथील पेंच धरण,
रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे आणि रत्नागिरी येथे रत्नागिरी येथून सी प्लेन सेवा सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून हा प्रस्ताव विमान वाहतूक मंत्रालय आणि विमानतळ प्राधिकरणाकडे पाठवण्यात आला आहे.
दरम्यान एमएडीसी कडून पाठवण्यात आलेल्या या प्रस्तावावर सकारात्मक निर्णय झाला तर महाराष्ट्रातील या संबंधित ठिकाणांच्या पर्यटनाला चालना मिळेल असा विश्वास एमएडीसी प्राधिकरणाकडून व्यक्त करण्यात आला आहे.