Maharashtra Rain: महाराष्ट्रासाठी पुढील 4 ते 5 दिवस महत्त्वाचे! राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा अंदाज, हवामान विभागाचा इशारा

Published on -

Maharashtra Rain:- गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रात पावसाने हाहाकार माजवला असून महाराष्ट्रातील बऱ्याच भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झालेली आहे व झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झालेले आहे. कोल्हापूर तसेच सातारा व सांगली या परिसरात तर महापुराचा धोका निर्माण झाल्यामुळे सध्या प्रशासन देखील अलर्ट मोडवर आहे.

या सगळ्या परिस्थितीमध्ये मात्र गेल्या दोन ते तीन दिवसापासून राज्यातील काही भागांमध्ये पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र होते. आता या विश्रांतीनंतर पुन्हा पाऊस जोर पकडणार असल्याचा इशारा हवामान विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे.

या इशाऱ्यानुसार बघितलं तर विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्र व कोकणात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

 राज्याच्या या भागात जोरदार पावसाची शक्यता

याबाबत सविस्तर वृत्त असे की, पश्चिम बंगालच्या उपसागरामध्ये ठळक कमी दाबाचे क्षेत्र पश्चिम बंगाल आणि उत्तर ओडिसावर सक्रिय आहे. हे क्षेत्र पुढील 24 तासात वायव्यकडे सरकत आहे. त्यासोबतच पश्चिम किनारपट्टीवर गुजरात ते केरळ दरम्यान समुद्रसपाटीला समांतर कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

त्यामुळे विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकणामध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाच्या माध्यमातून वर्तवण्यात आला आहे.

एवढेच नाही तर येणाऱ्या चार ते पाच दिवसांमध्ये महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुणे हवामान विभागाचे प्रमुख के.एस.होसाळीकर यांनी याबाबत ट्विट करून माहिती दिलेली असून या ट्वीटमध्ये 27 जुलै ते 30 जुलै या चार दिवसांचा हवामान अंदाज त्यांनी नकाशाच्या माध्यमातून दर्शवलेला आहे.

 पुण्याला पुन्हा अतिवृष्टीचा इशारा

पुणे जिल्ह्यामध्ये पावसाने थैमान घातल्याचे चित्र आहे व अनेक ठिकाणी जनजीवन झालेले असताना पुन्हा पुणे जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.

विशेष करून घाटमाथ्याच्या परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देखील हवामान विभागाने दिला आहे. यासंबंधीची माहिती पुणे हवामान विभागाचे प्रमुख के.एस. होसाळीकर यांनी दिली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News