Maharashtra Schools : येत्या 16 जून पासून महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या शाळा सुरू होणार आहेत. 16 जून 2025 पासून महाराष्ट्राचे बोर्डाचे नवीन शैक्षणिक वर्ष म्हणजेच शैक्षणिक वर्ष 2025 ची सुरुवात होणार आहे. या दिवशी राज्यातील जवळपास 25 जिल्ह्यांमध्ये शाळा सुरू होतील आणि विदर्भातील शाळा 23 जून पासून सुरू होणार आहेत.
नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्याआधीच राज्यातील शिक्षकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. म्हणून जर तुम्हीही शिक्षक म्हणून कार्यरत असाल किंवा तुमच्या कुटुंबातून कोणी शिक्षक म्हणून सेवा बजावत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी अधिक महत्त्वाची राहणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण व्यवस्थेत शिस्त आणि गुणवत्ता यांना अधिक प्राधान्य देण्यासाठी सरकारने नुकताच एक अगदीच महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
राज्यातील जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या संदर्भात सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता झेडपी शिक्षकांच्या वर्तणुकीवर प्रशासनाचे लक्ष केंद्रित होणार आहे.
शिक्षण विभागाच्या नव्या धोरणांनुसार, शिक्षकांना चांगल्या वर्तणुकीसाठी आणि गुणवत्तापूर्ण अध्यापनासाठी विशेष प्रशिक्षण दिले जाणार असून त्यांच्या प्रत्येक हालचालीवर आता बारकाईने नजर सुद्धा ठेवली जाणार आहे.
आता शाळेच्या शिस्तबद्ध कारभारात कोणतीही ढिलाई खपवून घेतली जाणार नाही. जे शिक्षक शिस्त पाळणार नाहीत त्यांच्यावर कठोर कारवाई सुद्धा होणार आहे.
शिक्षण विभागाची शिक्षकांवर असणार नजर
राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांनी आपली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडावी, यासाठी शिक्षण विभागाने काही विशिष्ट बाबींवर लक्ष केंद्रित केले असल्याची माहिती समोर आली आहे.
यानुसार आता मुख्याध्यापकांच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणताही शिक्षक गैरहजर राहिल्यास त्याच्यावर कारवाई होणार असल्याची माहिती संबंधितांकडून देण्यात आली आहे.
शिवाय, शाळेच्या वेळेपूर्वीच शाळा सोडणारे, जेवणाच्या सुट्टीत गुपचूप निघून जाणारे शिक्षक सुद्धा आता नियंत्रणाखाली राहणार आहेत. अशा शिक्षकांवर आता कारवाईची टांगती तलवार राहणार आहे.
विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होऊ नये म्हणून हे पाऊल उचलण्यात आले असल्याचे बोलले जात आहे. याशिवाय, शाळेत मद्यपान करून किंवा तंबाखू-गुटखा सेवन करून येणाऱ्या शिक्षकांवर कठोर नजर ठेवण्यात येणार असून, अशा शिक्षकांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.
काय कारवाई होणार?
मुख्याध्यापकांच्या पूर्वपरवानगीशिवाय गैरहजर राहणे, शाळेच्या वेळी पूर्वी शाळा सोडून जाणे, जेवणाच्या सुट्टीत गुपचूप निघून जाणे, मद्यपान करून शाळेत येणे, तंबाखू गुटखा सेवन करणे अशा प्रकरणात जे शिक्षक दोषी आढळून येतील त्यांच्यावर निलंबन,
वेतनवाढ रोखणे किंवा सेवा समाप्त करण्यासारखी कठोर कारवाई केली जाणार आहे. यामुळे शिक्षकांनी आपली शारीरिक आणि मानसिक शिस्त कायम ठेवणे अत्यंत गरजेचे राहणार आहे.