भंडारदरा : अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणालगतच्या अभयारण्यामध्ये डोंगरची काळी मैना पिकायला सुरुवात झाली आहे. फक्त उन्हाळ्यातच चाखावयास मिळणारा हा रानमेवा भंडारदऱ्याच्या बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल झाला आहे. हा रानमेवा आदिवासी बांधवांच्या उपजीविकेचे साधन ठरत असला तरी बाहेरील व्यापारी कवडीमोल भावाने आदिवासी बांधवांकडून खरेदी करत आहेत.
भंडारदऱ्याच्या कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यात करवंदाच्या काळ्या भोर जाळ्या लगडताना दिसून येत आहेत. या जंगलच्या रानमेव्याची चवच न्यारी असते. चैत्र महिना सुरू झाल्यानंतर प्रथम दर्शन होते, ते आंबट गोड चवीच्या करवंदाचे. डोंगराच्या कुशीत याच्या काटेरी जाळ्या पसरलेल्या असतात. या झाडाला पांढऱ्या रंगाची फुले येतात.

फुलांची गळती झाल्यावर हिरव्या रंगाची करवंद बहरतात. पूर्णपणे पिकल्यावर या फळांचा रंग काळा होतो. आदिवासी बांधव पहाटे लवकर उठून करवंदे तोडण्यासाठी रानात पायपीट करतात. आजूबाजूच्या खेड्यापाड्यात आणि शहरी भागात विक्रीसाठी नेतात. ‘डोंगरांची काळी मैना’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या करवंदांचा गोडवा वाढत्या तापमानात मनाला गारवा देणारा आहे.
करवंदं पिकायला लागली की, भंडारदऱ्याच्या बाजारपेठेत करवंदं विकणाऱ्या मुलांच्या टोळ्या दिसून यायच्या. या करवंदाच्या विक्रीतून उपलब्ध होणाऱ्या पैशावर शाळकरी मुले आपल्या वह्या-पुस्तकांची गरज भागवत होती. पंरतु गत तीन ते चार वर्षापासून या मुलांना मोबाईलचे वेड लागल्याने मुल करवंद विकताना दिसत नाही. घाटघर, साम्रद, रतनवाडी, उडदावणे, या भागामध्ये काही व्यापारी करवंदे खरेदी करण्यासाठी येतात. परंतु करवंदे खरेदी करताना व्यापारी अगदी कवडीमोल भाव या आदिवासी बांधवांना देत आहेत.
चांगल्या आरोग्यासाठी करवंद अतिशय उपयुक्त आहे. हे बेरी वर्गीय फळ असून त्याचा आरोग्यासाठी चांगल उपयोग होतो. यामधील अनेक घटक रोग प्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करतात. करवंद हे नाशवंत फळ असल्यानं जास्त काळ टिकत नाही. मात्र, कच्च्या करवंदाचं लोणचं आणि पिकलेल्या करवंदांचा मुरब्बा केला तर जास्त काळ टिकतो.