Ahmednagar News: अहमदनगर जिल्ह्यातील जर आपण विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून एकंदरीत राजकीय वातावरण बघितले तर ते अतिशय रंगतदार होताना दिसून येत आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदारसंघातून इच्छुकांची गर्दी वाढताना दिसून येत आहे व त्यामुळे काँग्रेस व भाजप सारख्या पक्षांनी इच्छुकांच्या मुलाखती आयोजित केलेल्या होत्या.
या मुलाखती दरम्यान देखील भाजप असो वा काँग्रेस यांच्यातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. इतकेच नाही तर काही ठिकाणी तर जर टिकीट मिळाले नाही तर बंडखोरी किंवा अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्धार सुद्धा अनेक जणांच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

यामध्ये मात्र शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघ हा काही दृष्टिकोनातून खूप वेगळा ठरत आहे. नुकतेच अकोले या ठिकाणी विविध विकास कामांच्या भूमिपूजन कार्यक्रम पार पडला व या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपचे तालुकाध्यक्ष डॉ मृत्युंजय गर्जे होते.
तसेच या कार्यक्रमाला पालवेवाडी तसेच जांभळी, धायतडकवाडी, मोहोज देवढे इत्यादी गावांचे कार्यकर्ते देखील मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी आमदार मोनिका राजळे यांनी मात्र विरोधकांचा चांगलाच खरपूस समाचार घेतला. त्यांनी बोलताना विविध मुद्द्यांना हात घालत विरोधकांवर शाब्दिक हल्ला चढवला.
आमदार मोनिका राजळे यांचा विरोधकांवर कडाडून हल्ला
पाथर्डी तालुक्यातील अकोले येथे विविध विकास कामांचा भूमिपूजन कार्यक्रम पार पडला व या कार्यक्रमाप्रसंगी आमदार मोनिका राजळे यांनी विरोधकांवर शरसंधान साधले. त्यांनी बोलताना म्हटले की, शासनाचे पत्र मिळवून कामे केल्याचा आव आणणे, फोटोसेशन करून सवंग लोकप्रियतेसाठी बॅनरबाजी तसेच गावागावात कर्मचाऱ्यांमार्फत फटाके फोडणे असले उद्योग करून स्वतःचे मनोरंजन करता येऊ शकते.
तसेच काही लोकांना आमदारकीची दिवसा स्वप्ने पडत असून प्रचारकी टीका करून लोक भुलणार नाहीत. कितीही केले तरी सरड्याची धाव कुंपणापर्यंत असते व कोणत्याही योजनेला जिल्हा परिषदेची योजना समजू नका, असा इशाराच आमदार मोनिका राजळे यांनी विरोधकांना दिला.
पुढे बोलताना आमदार मोनिका राजळे म्हणाल्या की, शेवगाव पाथर्डी तालुक्यातील आठ रस्त्यांना 54 कोटींचा निधी प्राप्त झाला असून येणाऱ्या काळात तेवढाच निधी मिळणार आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून मतदार संघाला भरपूर निधी मिळाल्यामुळे विकास कामे झाली.
शेवगावच्या पाणीपुरवठा योजनेकरिता 72 कोटी 50 लाख रुपये मिळाले. या सगळ्या योजनेचे खोटे श्रेय घेण्याचा मोह विरोधकांना आवरला नाही. आपलीच ढोलकी, आपल्याच कामट्या, कितीही वाजल्या तरी त्यातून आवाज दुसरा येणारच नाही. एवढ्या मोठ्या योजनेचे श्रेय घ्यायला शासनाला जिल्हा परिषद समजण्याची चूक करू नका.
निवडणुका आल्या की मेळावे तसेच यात्रा घेतल्या जातात. परंतु अहोरात्र लोकांमध्ये फिरणारे कोण आणि उमेदवारी अर्ज गाडीत घेऊन बरळत फिरणारे कोण त्याची चांगली जाण लोकांना आहे.
राजकीय कारकिर्दीमध्ये आपण कामावर व जनसंपर्कावर लक्ष केंद्रित करून वाटचाल करत असून या माध्यमातून टीकाकारांकडे लक्ष दिले नसल्याचे देखील त्यांनी म्हटले.
आपलाच उपक्रम कॉपी–पेस्ट करून फॉरवर्ड करतात
तसेच आमदार मोनिका राजळे यांनी बोलताना म्हटले की, राजकीय बुद्धीभेद करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करा आणि राज्य शासनाच्या कल्याणकारी योजना हाणून पाडण्याचा विरोधकांचा डाव कधीच यशस्वी होणार नाही. विरोधकांना लोकांचा प्रतिसाद मिळत नसल्याने योजनांच्या विरोधात न्यायालयात जाण्याची भाषा ते बोलतात.
कामे आपण करतो, परंतु नारळ ते फोडतात. लोकांमध्ये आपण राहतो व शिव्या ते देतात. आपलेच उपक्रम कॉपी-पेस्ट करून फॉरवर्ड करण्याचे काम विरोधक करतात.
त्यामुळे आता कार्यकर्त्यांनी जशास तसे उत्तर द्यावे. जे राजकीय बुद्धीभेद करत असतील त्यांच्याकडे दुर्लक्ष करा व ज्यांना पक्ष व विचारधारा मान्य नाही तसेच पक्षशिस्तीशी काही देणे घेणे नाही अशी माणसे बुद्धिभेद करत असल्याची जोरदार टीका या निमित्ताने आमदार मोनिका राजळे यांनी केली.