Pune Metro News : महाराष्ट्रातील पुणे, मुंबई आणि नागपूर या शहरांमध्ये मेट्रो ची सेवा सुरू झाली आहे. महत्वाची बाब म्हणजे या शहरांमधील नागरिकांकडून मेट्रोला चांगला प्रतिसाद सुद्धा मिळतोय. पुण्याबाबत बोलायचं झालं तर शहरात सध्या स्थितीला दोन मेट्रो मार्ग सुरू आहेत.
महामेट्रो कडून पुणे महानगरपालिका ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या मार्गांवर मेट्रो सुरू करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे या मेट्रो मार्गांचे विस्तारीकरणाचे काम देखील महा मेट्रो कडून हाती घेण्यात आले आहे.

दुसरीकडे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून शिवाजीनगर ते हिंजवडी यादरम्यान मेट्रो मार्ग विकसित केला जात आहे. हा शहरातील तिसरा मेट्रो मार्ग राहणार असून याला पुणेरी मेट्रो या नावाने ओळखले जात आहे.
येत्या काही महिन्यांनी हा सुद्धा मेट्रो मार्ग पुणेकरांच्या सेवेत दाखल होणार आहे, हा मेट्रो मार्ग पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप म्हणजेच पीपीपी तत्त्वावर विकसित केला जात आहे. दरम्यान पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट या मेट्रो मार्गाच्या संदर्भात एक नवीन अपडेट हाती आली आहे.
काय आहे नवीन अपडेट?
मिळालेल्या माहितीनुसार आज 21 जून 2025 रोजी पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट या मेट्रो मार्गावरील एक महत्त्वाचे मेट्रो स्थानक पुणेकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. या मेट्रो मार्गावरील खडकी मेट्रो स्थानक आज पुणेकरांसाठी खुले करण्यात आले आहे.
या स्थानकाचे लोकार्पण झाल्यानंतर या मार्गावर प्रवास करणाऱ्या मेट्रो प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे. खरेतर, हे स्थानक पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट या मेट्रो मार्गावरील सर्वाधिक महत्त्वाचे स्थानक आहे.
कारण हे मेट्रो स्थानक खडकी रेल्वे स्थानकाच्या अगदी जवळ आहे. तसेच, या मेट्रो स्थानकातून प्रवाश्याना थेट खडकी रेल्वे स्थानकात जाण्यासाठी मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे.
यामुळे प्रवाशांना मेट्रो आणि रेल्वे या दोन्ही वाहतूक सेवांचा या स्थानकातून एक्सेस घेता येणार आहे. परिणामी, या परिसरातील नागरिकांना तसेच रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पुणे मेट्रोच्या सेवेचा लाभ घेणे सुलभ होईल अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे.
खडकी मेट्रो स्थानक सुरू झाल्यानंतर प्रवाशांना खडकी, पुणे विद्यापीठ, औंध आयटी पार्क, खडकी कॅन्टोन्मेंट, खडकी बाजार, रेंज हिल, औंध रस्ता, ऑर्डीनन्स फॅक्टरी हॉस्पिटल, मुळा रस्ता अश्या महत्वाच्या ठिकाणी पोहचणे सोयीस्कर होणार असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.