Shaktipith Expressway : नागपूर ते गोवा प्रवास वेगवान केला जाणार आहे. यासाठी नवा महामार्ग डेव्हलप केला जाणार आहे. दरम्यान या प्रस्तावित असलेल्या महत्त्वाकांक्षी ‘शक्तिपीठ महामार्गा’बाबत मोठी आणि महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
खरेतर हा महामार्ग प्रकल्प 2024 मध्ये झालेल्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात चर्चेत आला होता. या महामार्ग प्रकल्पामुळे भारतीय जनता पक्षाला लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसला.

यामुळे तत्कालीन सरकारने हा महामार्ग प्रकल्प रद्द झाल्याची घोषणा सुद्धा केली होती. पण त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला चांगले यश मिळाले आणि त्यानंतर महायुतीने पुन्हा या महामार्गाला मंजुरी देण्याचा निर्णय घेतला.
या महामार्ग विरोधात बाधित शेतकऱ्यांनी आक्षेप नोंदवला होता. सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी या मार्गासाठी तीव्र विरोध केला होता. याच विरोधाची दखल घेत आता राज्य सरकारने या महामार्गाच्या मूळ आराखड्यात (अलाईनमेंट) मोठे फेरबदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
या बदलांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे. यामुळे आता काही तालुके थेट महामार्गाच्या नकाशातून वगळले जाण्याची शक्यता निर्माण झाली असून, संबंधित भागात संभ्रमाचे वातावरण आहे. नेमका या मार्गाचा रूट कसा असणार हा सवाल उपस्थित होतोय. आता आपण याचबाबत सविस्तर माहिती पाहणार आहोत.
महामार्गाचे अलाइनमेंट बदलले
शेतकऱ्यांची सुपीक बागायती जमीन, पाण्याचे स्रोत आणि सिंचन व्यवस्था सुरक्षित राहावी म्हणून या महामार्गाला मोठ्या प्रमाणात विरोध दाखवण्यात आला. या अनुषंगाने आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महामार्गाची नव्याने आखणी करण्याची घोषणा केली आहे.
नव्या प्रस्तावानुसार, धाराशिवपासून मार्ग वळवून तो सांगलीच्या आटपाडी मार्गे चंदगडकडे नेण्याचा विचार सुरू असल्याची माहिती खात्रीशीर सूत्रांच्या माध्यमातून आता पुढे आली आहे.
यामुळे मूळ प्रस्तावित मार्गात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. जर महामार्गाची नवी आखणी तुळजापूर–करकंब–शिखर शिंगणापूर मार्गे साताऱ्याकडे वळवली गेली, तर सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर, मोहोळ, पंढरपूर आणि सांगोला हे चार महत्त्वाचे तालुके महामार्गाच्या नकाशातून वगळले जाऊ शकतात.
याशिवाय, सांगली जिल्हा या महामार्गाच्या मूळ नकाशातून पूर्णपणे बाहेर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुसरीकडे, मूळ मार्गाऐवजी माढा आणि माळशिरस या तालुक्यांतून महामार्ग नेण्याबाबत चर्चा सुरू आहे.
दरम्यान, महामार्गाविरोधातील संघर्ष अधिक तीव्र होत चालला आहे. ‘बार्शी तालुका शक्तिपीठ विरोधी संघर्ष समिती’च्या वतीने आज, बुधवारी (७ जानेवारी) सोलापूर जिल्ह्यातील रुई (भालगाव) येथे राज्यस्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्यासाठी तब्बल १० जिल्ह्यांतील शेतकरी एकत्र येणार असून, महामार्गाविरोधातील पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे. महामार्गाचा नवा मार्ग नेमका कुठून जाणार, याबाबत अद्याप अधिकृत राजपत्र (गॅझेट) प्रसिद्ध झालेले नाही.
मात्र, सोशल मीडियावर अफवांचे पेव फुटले आहे. वैराग परिसरात “कोणीही जमीन विकू नका” असे संदेश व्हायरल होत आहेत, तर काही भागांत प्रस्तावित बदलांचे स्वागतही होताना दिसत आहे. अधिकृत निर्णय येईपर्यंत शक्तिपीठ महामार्गाचा विषय राज्यात चर्चेचा केंद्रबिंदू ठरण्याची चिन्हे आहेत.













