Thane Metro News : मुंबई नागपूर पुणे यांसारख्या शहरांमध्ये मेट्रो सुरु झाली आहे आणि या शहरांमधील मेट्रो मार्गांचे विस्तारीकरणाचे काम सुद्धा युद्ध पातळीवर सुरू आहे. दुसरीकडे ठाण्यातही लवकरच मेट्रो धावताना दिसेल.
असे असतानाच आता ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो-5 प्रकल्पाबाबत मोठी अपडेट हाती आली आहे. हा मेट्रो मार्ग लवकरच अंबरनाथला जोडला जाणार आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की मेट्रो 5 प्रकल्पाचा विस्तार केला जाणार आहे आणि हा मार्ग अंबरनाथ-बदलापूरदरम्यान असलेल्या चिखलोली रेल्वे स्थानकाशी जोडण्यात येईल. महत्त्वाची बाब अशी की,
याचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (MMRDA) नुकताच घेण्यात आला आहे. यामुळे चिखलोली हे स्थानक भविष्यातील एक प्रमुख ट्रान्सपोर्ट हब म्हणून विकसित होणार आहे आणि या निर्णयामुळे या भागातील विकासाला चालना मिळेल.
काय फायदा होणार?
ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो-5 चिखलोली रेल्वे स्थानकाला जोडल्यास दुर्गाडी नाका, कल्याणमार्गे उल्हासनगर, बदलापूरपर्यंत मेट्रोसेवा पोहोचणार आहे.
यामुळे अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगरसह परिसरातील नागरिकांना ठाणे व मुंबई गाठणे अधिक सुलभ होणार असा विश्वास जाणकारांकडून व्यक्त करण्यात आला आहे.
याचप्रमाणे, कल्याण-बदलापूर-कांजूरमार्ग मेट्रो-14 प्रकल्पामुळे सुद्धा या भागातील प्रवाशांचा बहुमूल्य वेळ वाचणार आहे आणि या भागातील नागरिकांना सुरक्षित प्रवास करता येणार आहे.
नव्या मेट्रो मार्गांचा DPR तयार
खरे तर, या दोन्ही मेट्रो मार्गाचे DPR म्हणजे सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केले जात आहेत आणि लवकरच या प्रकल्पाच्या कामासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.
एमएमआरडीएने याच्या विकास आराखड्याची तयारी सुद्धा सुरू केली आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी एमएमआरडीएच्या बैठकीत चिखलोली स्थानकावर रेल्वे आणि मेट्रोचे एकत्रिकरण करण्याचे सूचवले असून, स्थानक उभारणी तशाच पद्धतीने होणार आहे.
आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनीही यासाठी आग्रह धरला होता. दरम्यान आता लोकप्रतिनिधींची ही मागणी पूर्ण होताना दिसत आहे. चिखलोली स्थानकावर रेल्वे आणि मेट्रोचे एकत्रीकरण होणार आहे.
दरम्यान या मेट्रो मार्गाच्या विस्तारामुळे “एक शहर, एक मेट्रो नेटवर्क” या संकल्पनेतून या भागातील वाहतूक व्यवस्था सुटसुटीत होणार आहे. या निर्णयानंतर चिखलोलीसारखे उपेक्षित स्थानक भविष्यातील वाहतूक केंद्र म्हणून उदयास येणार आहे, असा विश्वास जाणकार लोकांकडून व्यक्त केला जातोय.