श्रीगोद्याच्या आजी माजी आमदारांनी शेतकऱ्यांना फसवले, उसाच्या पैशांसाठी निवासस्थानासमोर शेतकर्‍यांचे आंदोलन

श्रीगोंदा :- तालुक्यातील कुकडी सहकारी साखर कारखाना लिमिटेड व साईकृपा शुगर अँड अलाईड लिमिटेड(हिरडगाव)या साखर कारखान्याकडे श्रीगोंदा, कर्जत-जामखेड या तालुक्यासह अन्य तालुक्यातील शेतकर्‍यांची ऊसाची थकलेली बिले तातडीने मिळावीत,

या मागणीसाठी संभाजी ब्रिगेड ने माजीमंत्री बबनराव पाचपुते यांच्या आणि आमदार राहुल जगताप यांच्या निवासस्थानी जाऊन सोमवारी बेमुदत ठिय्या ठोकत, चूल पेटवून आंदोलन सुरू केले आहे.

श्रीगोंदा तालुक्यात वारंवार पडणारा दुष्काळ व नापिकी जमिन यामुळे शेतकरीवर्ग त्रस्त झाला आहे.  सध्या शैक्षणिक वर्ष सुरू झाल्याने विद्यार्थी शेतीसाठी व दैनंदिन खर्चासाठी शेतकर्‍यांना आर्थिक मदतीची गरज आहे. दोन्ही कारखान्यांना ऊस दिला.

त्यानंतर बराच कालावधीही उलटून गेला असे असतानाही शेतकर्‍यांची उसाची बिले अद्यापही दोन्ही कारखान्यांनी दिली नाहीत. हिरडगावच्या साईकृपा कारखान्याकडे काही वाहतुकदारांची बिले अनेक वर्षांपासून थकलेली आहेत. ती बिले मिळण्यासाठी संभाजी ब्रिगेड यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. परंतु त्यांची दखल घेतली गेली नाही.

त्यामुळेच सोमवारी (दि.22) आंदोलनास शेतकर्‍यांनी प्रारंभ केला आहे. ऊसाचे बिले मिळत नसल्याने ऊस उत्पादक शेतकरी कारखानदारावर नाराज झाले आहेत.

शेतकर्‍यांच्या उसाची बिले लवकरात लवकर अदा करण्यात यावी, ऊसाच्या बिले न मिळाल्याने अनेक शेतकर्‍यांच्या मुलांची विवाह मोडली तर अनेकांच्या मुलांचे शिक्षणात आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. यामुळे तातडीने शेतकर्‍यांची ऊसाची बिले मिळावीत, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळक भोस यांनी केली आहे.

या आंदोलनात श्रीरामपूर, गंगापूर, भूम, जामखेड, शिरूर, राहुरी, कर्जत, करमाळा, आष्टी आदी ठिकाणांचे शेतकरी आंदोलनात सहभागी झाले आहेत.