शिर्डीत अतीवृष्टी; ‘ह्या’ भागात घरांत शिरले पाणी

अहमदनगर Live24 टीम,21 सप्टेंबर 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. जिल्ह्यात काही भागात वादळी वार्‍यासह जोरदार पाऊस झाला.

शिर्डीमधेही अतीवृष्टी झाली. याझालेल्या मुसळधार पावसामुळे आंबेडकरनगर, सीतानगर, लक्ष्मी नगरमधील रहिवाशांच्या घरात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले.

प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी पाहणी करत बंदिस्त नाला तातडीने उकरून पाण्याचा प्रवाह मोकळा करण्याचे आदेश दिल्याने नागरिकांना दिलासा मिळाला.

यावेळी प्रांताधिकारी शिंदे यांनी तातडीने सदरची पहाणी करत बंदिस्त नाला जेसीबीच्या सहाय्याने उकरून काढण्यासाठी आदेश दिल्याने पाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

यावेळी उपस्थित शिर्डी ग्रामस्थांनी सदरचा बंदिस्त नाला हा ओपन करून नकाशाप्रमाणे रुंदीकरण करण्यात यावा, अशी मागणी प्रांताधिकारी शिंदे यांना केली.

दरम्यान संबंध जिल्ह्यामध्ये सतत होणाऱ्या पावसामुळे शेतकरी हैराण झाला आहे. अतिपावसामुळे खरीप पिकांची चांगलीच दाणादाण उडाली.

मका, कपाशी, ऊस, सोयाबीन पिकाचे नुकसान होऊन उभी असलेले पिके भुईसपाट झाले आहे. या पावसामुळे येथील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.

पावसाने कुठे शेतात पाणी साचले. तर कुठे बाजरी पीक भूईसपाट झाले. परिसरातील बाजरी, भुईमूग, मका, ऊस, जनावरांचा चारा आदी पिकांमध्ये पाणी साचले.

सुरुवातीला जोमात आलेले कपाशीचे पीक आता मोठ्या प्रमाणात पाते गळू लागल्यामुळे धोक्यात येऊ लागले आहे. या पावसामुळे झाडांची खालची पाने लालसर-पिवळी पडू लागली आहेत.

कपाशीवर मावा-तुडतुड्यांचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. काही ठिकाणी कपाशीचे पीक पाण्यात डुंबत होते. तर काही ठिकाणी जास्त पाण्यामुळे कापसाचे रोपटे वाहून गेल्याचे प्रकार घडले आहेत.

गेल्या तीन चार दिवसांपासून सतत पडत असलेल्या पावसामुळे काढणीला आलेली खरिपाची पिके पाण्याखाली जात आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved