औरंगाबादच्या त्या अपह्रत मुलाची बारा तासानंतर सुखरूप सुटका

अहमदनगर Live24 टीम, 10 जून 2021 :- औरंगाबाद येथील बजाज नगरमध्ये राहणाऱ्या एका ६ वर्षीय मुलाचे अपहरण करून पळून जाणाऱ्या आरोपीस श्रीगोंदा पोलिसांनी अवघ्या १२ तासात जेरबंद  करून औरंगाबाद पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

सागर आळेकर असे आरोपीचे नाव आहे.श्रीगोंदा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यांना औरंगाबाद येथील एका ६ वर्षीय मुलाचे श्रीगोंदा शहरातील सागर आळेकर याने अपहरण केले असून, तो श्रीगोंदा येथे येणार असल्याची माहिती दिली.

त्यानूसार पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनी दिलीप तेजनकर यांना नगर दौंड रोडवर पारगाव फाटा येथे नाकाबंदी करत आरोपीला ताब्यात घेण्याचे आदेश दिले. त्यानूसार त्यांनी पारगाव फाटा येथे

नाकाबंदी करत सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास दौंड कडे जाणाऱ्या स्विफ्ट डिझायर (क्र.एम.एच.४२ ए.एच.९६५५) थांबवत आरोपी सागर गोरख आळेकर यास त्याने पळवुन आणलेल्या ६ वर्षीय मुलासह ताब्यात घेतले.

मुलास त्याचे आईवडीलांच्या ताब्यात दिले. आरोपीस पुढील कारवाईसाठी औरंगाबाद शहर पोलिसांच्या ताब्यात दिले.