लसीकरण अधिक गतीने होण्याची गरज : मंत्री बाळासहेब थोरात

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 11  जुलै 2021 :- जिल्ह्यात अद्यापही दैनंदिनरित्या साधारणत: तीनशे ते पाचशे रुग्ण आढळून येत आहेत.

त्यामुळे रुग्ण आढळून येत असलेल्या भागात कडक उपाययोजना कराव्यात तसेच लसीकरण मोहिम अधिक गतीने राबविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

याबाबत राज्य पातळीवर पाठपुरावा करुन जिल्ह्यासाठी लसीचा अधिक पुरवठा होईल, याबाबत लक्ष घालू असे त्यांनी स्पष्ट केले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात थोरात यांनी कोरोना उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेतली.

थोरात यांनी कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन करत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. संभाव्य लाट रोखण्यासाठी जे जे आवश्यक उपाय आहेत, त्याची प्रभावी अंमलबजावणी गरजेची आहे.

त्याचबरोबर ज्या भागात रुग्ण आढळून येत आहेत, तेथील कारणे शोधून प्रतिबंधात्मक उपाययोजना त्याठिकाणी तात्काळ केल्या जाणे आवश्यक आहे. सध्या दुसऱ्या लाटेतही काही तालुक्यात अद्यापही रुग्ण संख्या वाढताना दिसत आहे.

ही चिंतेची बाब आहे. जिल्हा प्रशासनाने त्याठिकाणी सर्वेक्षण करुन बाधितांना शोधून संपर्क साखळी तोडण्याची आवश्यकता आहे.

याचबरोबर, जिल्ह्यात सध्या लसीकरणाचा वेग काहीसा कमी आहे. प्राप्त झालेल्या लसींचे योग्य नियोजन करुन त्याचा वेग वाढविण्याची आवश्यकता आहे, असे ते म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News