राऊतांच्या विधानानंतर खुद्द मुख्यमंत्र्यांकडूनच वळसे-पाटील यांची पाठराखण; चर्चेला मात्र उधाण

Published on -

मुंबई : शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी गृहखात्यावरून राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (dilip walse patil) यांची कान टोचणी केली आहे.

यावरून आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी स्पष्टीकरण दिले आहे. मुख्यमंत्री ठाकरे व वळसे-पाटील यांच्या जवळपास तासभर चर्चा झाली असून भाजप (Bjp) नेत्यांवर पुरावे देऊनही गृहखात्याकडून कारवाई होत नसल्याच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेते बोलल्याचे समजते आहे.

भेटीनंतर दिलीप वळसे पाटील उत्तम काम करत असल्याचे ठाकरे म्हणाले आहेत. तसेच गृहमंत्र्यांवर मुख्यमंत्री नाराज अशा बातम्या काही माध्यमांवर येत आहेत.

या बातम्यांना उद्धव ठाकरे यांनी पूर्णविराम दिला आहे. अशा बातम्या चुकीच्या आणि विपर्यास्त करणाऱ्या असून माझा माझ्या सहकाऱ्यांवर पूर्ण विश्वास आहे, आणि ते उत्तम काम करीत आहेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी दिलीप वळसे पाटील यांची पाठराखण केल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. तसेच येणाऱ्या काळात भाजप नेत्यांवर कारवाई करण्याबाबत या दोन्ही नेत्यांमध्ये एकमत झाले का? अशी चर्चाही सर्वत्र सुरु आहे.

राऊत काय म्हणाले होते?

गृहखात्याने अधिक सक्षम झालं पाहिजे. काल या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली आहे. तपास यंत्रणा राज्यात येऊन कारवाया करत आहेत हे गृहखात्यावर आक्रमण आहे.

या प्रकाराकडे गंभीरपणे पाहिलं पाहिजे. आस्ते कदम भूमिका कोणी घेत असेल तर ते स्वत:साठी फाशीचा दोर वळत आहेत. आता गृहखात्यालाच दमदार पावलं टाकावी लागेल. नाही तर तुम्ही तुमच्यासाठी रोज नवा खड्डा खोदाल, असा इशारा शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिला होता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe