Tomato Rate : महाराष्ट्रात टोमॅटो या भाजीपाला वर्गीय पिकाची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. खरं पाहता केल्या हंगामात टोमॅटोला चांगला दर मिळाला होता, विशेष म्हणजे या हंगामात देखील टोमॅटोला चांगला दर मिळत होता. मात्र आता टोमॅटो दरात मोठी घसरण झाली आहे. यामुळे टोमॅटो उत्पादकांना मोठा फटका बसत आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात टोमॅटोची शेती केली जाते. पुणे जिल्ह्यातील दिवे परिसर हा टोमॅटो उत्पादनासाठी अलीकडे विशेष ओळखला जाऊ लागला आहे. यावर्षी देखील दिवे परिसरात टोमॅटोची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली आहे. मात्र टोमॅटोला सध्या कवडीमोल दर मिळत असल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे.
दिवे घाटात टोमॅटो उत्पादक आर्थिक कोंडीत अस चित्र पाहायला मिळत आहे. सध्या मिळत असलेल्या बाजारभावात शेतकऱ्यांना टोमॅटो तोडणीसाठी येणारी मजुरी देखील काढता येणे अशक्य बनले असल्याने शेतकऱ्यांनी टोमॅटो पीक तसेच वावरातच सोडून दिले आहे. गेल्या आठवड्यात दोनशे रुपयांना टोमॅटोचे कॅरेट विकले जात होते.
मात्र आता अवघा 80 रुपये ते शंभर रुपये एवढा दर टोमॅटो कॅरेटला मिळत असल्याने बळीराजा हतबल झाला आहे. म्हणजेच सध्या टोमॅटोला अवघा चार रुपये किलो ते पाच रुपये किलो एवढा दर मिळत आहे.
आशा परिस्थितीत सांगा मी शेती करायची कशी असा सवाल टोमॅटो उत्पादकांकडून उपस्थित केला जात आहे. सध्या दिवे परिसरात टोमॅटो उत्पादक शेतकरी बांधव टोमॅटोला मिळत असलेल्या कवडीमोल दरामुळे संकटात सापडले असून टोमॅटोचे फड तसेच तोडणी अभावी उभे पाहायला मिळत आहे.
टोमॅटो उत्पादक शेतकरी बांधवांनी टोमॅटो तोडणी करण्यासाठी देखील परवडत नसल्याचे सांगत टोमॅटो तसेच सोडून दिले आहेत. निश्चितच टोमॅटो बाजारभावातील लहरीपणा शेतकऱ्यांच्या मुळावर उठला आहे. यामुळे शेतकऱ्यांमागील शुक्लकाष्ठ केव्हा संपेल हा मोठा प्रश्न यावेळी उभा झाला आहे.