Ahilyanagar News: कर्जत- तालुक्यातील चिलवडी येथील भूमिहीन रहिवासी हरिश्चंद्र भीवा फरांडे यांना महावितरण कंपनीने कृषिपंपाच्या थकबाकीपोटी तीन लाख रुपयांचे वीज बिल भरण्याची नोटीस पाठवली आहे. विशेष म्हणजे, फरांडे यांच्या नावावर ना जमीन आहे, ना विहीर, ना कृषिपंप, तरीही त्यांना ही नोटीस मिळाली आहे. गेली चार वर्षे ते या चुकीच्या बिलाचा पाठपुरावा करत असून, महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर मिळत नाही. या अनागोंदी कारभारामुळे फरांडे कुटुंब हवालदिल झाले असून, त्यांना घरगुती वीज कनेक्शन मिळण्यातही अडचणी येत आहेत.
चुकीच्या नोटिसीचा शॉक
हरिश्चंद्र भीवा फरांडे हे चिलवडी येथील रहिवासी असून, त्यांचा उदरनिर्वाह आठवडी बाजारात लसणाची खरेदी-विक्री करून चालतो. मात्र, त्यांच्या नावावर एक गुंठाही जमीन नाही आणि त्यांनी कधीही कृषिपंपासाठी वीज कनेक्शन घेतलेले नाही. तरीही, महावितरणने त्यांना तीन लाख रुपयांचे कृषिपंपाचे वीज बिल थकबाकीपोटी भरण्याची नोटीस पाठवली आहे. या नोटिसीवर गट क्रमांक, ग्राहक क्रमांक आणि “५० टक्के भरा, थकबाकी मुक्त व्हा, अवघा महाराष्ट्र समृद्ध करा” असा मथळा असलेली ही नोटीस पाहून फरांडे यांना धक्काच बसला.
नोटिसीत वीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा देण्यात आला असून, यामुळे त्यांच्या कुटुंबावर मानसिक दबाव वाढला आहे. ही नोटीस घेऊन त्यांनी महावितरणच्या कर्जत आणि राशीन येथील कार्यालयांना भेटी दिल्या, परंतु अधिकाऱ्यांकडून कोणतेही समाधानकारक उत्तर मिळाले नाही.
भूमिहीन शेतकऱ्याची आर्थिक कोंडी

हरिश्चंद्र फरांडे यांचे जीवन साधे आहे. कर्जत, राशीन, मिरजगाव, करमाळा, भीगवण येथील आठवडी बाजारात लसण विकून ते आपला प्रपंच चालवतात. कोरोना काळापासून आणि वयोमानामुळे ते बहुतेक वेळा घरीच असतात. त्यांच्या नावावर कोणतीही जमीन किंवा शेती नाही, तरीही महावितरणने त्यांना कृषिपंपाचे बिल थकल्याचे सांगितले आहे. या चुकीच्या बिलामुळे त्यांना घरगुती वीज कनेक्शन मिळण्यातही अडचणी येत आहेत. गेल्या चार वर्षांपासून ते या समस्येचा पाठपुरावा करत आहेत, परंतु महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी त्यांच्याशी नीट बोलत नाहीत किंवा ठोस उत्तर देत नाहीत. यामुळे फरांडे यांची आर्थिक आणि मानसिक कोंडी झाली आहे.
महावितरणचा अनागोंदी कारभार
महावितरणच्या या चुकीच्या कारवाईमुळे प्रशासकीय गोंधळ आणि गैरव्यवस्थापन उघड झाले आहे. फरांडे यांना पाठवलेल्या नोटिसीवर गट क्रमांक आणि ग्राहक क्रमांक नमूद आहे, परंतु या माहितीची पडताळणी करण्यात महावितरण अपयशी ठरले आहे. राशीन येथील महावितरण कार्यालयाचे उपअभियंता अमोल कळंबे यांनी “नोटिसीची माहिती घ्यावी लागेल, चेक करावे लागेल” असे अस्पष्ट उत्तर दिले. यामुळे महावितरणच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अशा चुकीच्या नोटिसांमुळे सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे, आणि प्रशासनाकडून कोणतीही जबाबदारी स्वीकारली जात नाही.
शेतकऱ्यांचे आव्हान
हरिश्चंद्र फरांडे यांनी महावितरणला थेट आव्हान दिले आहे की, त्यांच्या नावावर असलेली विहीर, शेत आणि कृषिपंप प्रत्यक्ष दाखवावे. त्यांनी म्हटले आहे की, जर महावितरण हे सिद्ध करू शकले, तर ते तीन लाख रुपयांचे बिल भरण्यास तयार आहेत. मात्र, महावितरणकडून याबाबत कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.