औरंगजेब… तोच मुघल सम्राट, ज्याच्या नावाने अनेकांनी वर्षानुवर्षं भय आणि क्रौर्य अनुभवले. धर्मांध धोरण, हजारो मंदिरे पाडणं, लाखो हिंदूंचं रक्त सांडणं यामुळे तो इतिहासात एका निष्ठूर शासकाच्या रूपात ओळखला जातो. परंतु, त्याच्या मृत्यूच्या शेवटच्या टप्प्यावर मात्र तोच औरंगजेब एक वेगळाच चेहरा घेऊन समोर आला – पश्चात्तापाने भरलेला, अस्वस्थ आणि अंताच्या क्षणी मोडून पडलेला एक माणूस.
आपल्या भावांना ठार करून आणि वडील शाहजहान यांना बंदिवासात टाकून ज्याने गादी हस्तगत केली, त्या औरंगजेबने सत्ता टिकवण्यासाठी केवळ तलवार चालवली नाही, तर धर्माचंही शस्त्र केलं. त्याने वाराणसी, मथुरा आणि इतर अनेक पवित्र स्थळांवर आघात केला, शेकडो मंदिरे जमीनदोस्त केली. लाखो हिंदूंना इस्लाम स्वीकारायला लावलं. गुरु तेग बहादूर यांच्यासारख्या संतांनाही त्याच्या अमानुषतेचा बळी पडावं लागलं.

मात्र काळ कोणालाही सोडत नाही. आणि ज्याचं संपूर्ण आयुष्य अत्याचारांमध्ये गेलं, त्यालाही मृत्यूच्या छायेखाली स्वतःच्या कर्मांची जाणीव होऊ लागली. औरंगजेबच्या आयुष्याचा शेवट फार वेगळा होता. सत्ता आणि वैभवाच्या पराकाष्ठेला पोहोचलेला हा राजा शेवटी स्वतःला एकटं, असहाय्य आणि पापांनी भरलेला जाणवू लागला.
औरंगजेबाचे शेवटचे क्षण-
त्याने आपल्या शेवटच्या काळात लिहिलेल्या पत्रांमध्ये तो स्वतःलाच पापी म्हणतो. त्याच्याकडे ना राजेशाही वस्त्र उरले, ना रथ, ना कोणतीही ताकद. त्याच्या हातात उरलं होतं फक्त कुराण, जे तो वारंवार वाचत होता. त्याने स्वतःचं आयुष्य व्यर्थ गेलं असल्याची कबुली दिली. त्याने स्वतःला अल्लाहकडे पूर्णपणे समर्पित केलं.
शेवटच्या काळात औरंगजेबच्या मनाची स्थिती इतकी अस्वस्थ होती की झोप त्याच्या डोळ्यांपासून दूर गेली होती. तो रात्री अनेकदा जागून राहायचा, एकटाच बसून रडायचा, प्रायश्चित्ताच्या ओझ्याखाली दबल्यासारखा वाटायचा. त्याच्या अंत्यसंस्कारांसाठीही त्याने खास राजेशाही खर्च नको असल्याचं सांगितलं. उलट स्वतःच्या हाताने कमावलेल्या थोड्याशा कपड्यांची विक्री करूनच अंतिम विधी पार पाडा, अशी विनंती केली.
इतिहासकार काय सांगतात?
इतिहासकार सांगतात की हे शेवटचं रूप एक वेगळंच सत्य उघड करतं – की पापाचं साम्राज्य कितीही मोठं असलं, तरी त्याचा शेवट कायम अशांततेत होतो. औरंगजेबच्या आयुष्यातील ही शेवटची वळणं हे दाखवून जातात की माणूस कितीही ताकदवान असला, तरी अंतरात्मा आणि पश्चात्तापापासून तो सुटू शकत नाही.
त्याला अनेक संतांनी, विचारवंतांनी अधर्माच्या मार्गावर चालू नको असं सांगितलं होतं. पण त्या गर्वात तो कधी थांबला नाही. आणि अखेर… जेव्हा हातात काहीच उरलं नाही, तेव्हा त्याने डोळ्यांत पश्चात्तापाचे अश्रू भरून माफी मागितली.
हे सगळं पाहता, औरंगजेबचा शेवट हा केवळ एका शासकाचा नव्हता – तो एका माणसाच्या अंतरंगाचा, त्याच्या मनःस्थितीचा, आणि पापांच्या ओझ्याने झुकलेल्या आत्म्याचा अंत होता. एक असा राजा, जो जगाला झुकवू शकला, पण स्वतःच्या पापांपासून वाचू शकला नाही.