Ahilyanagar News : भूमिगत गटार दुर्घटनेत मृत पावलेल्या अतुल पवार व जावेद पिंजारी यांच्या कुटुंबीयांची काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी भेट घेऊन सांत्वन केले आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करून या दोन्ही कुटुंबांना तातडीने जास्तीत जास्त मदत मिळवून देऊ असे ते म्हणाले.
कोल्हेवाडी रोड येथे भूमिगत गटार दुर्घटनेमध्ये मृत पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांची माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भेट घेतली यावेळी समवेत मा. आ. डॉ. सुधीर तांबे, युवा काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्रीताई थोरात, शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, विश्वासराव मुर्तडक, नितीन अभंग, निखिल पापडेजा, गणेश मादास ,जावेद पठाण, लाला बेपारी, अंबादास आडेप, वैष्णव मुर्तडक, किशोर टोकसे, यांच्यासह शहरातील विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी माजी मंत्री थोरात म्हणाले की, झालेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे. नगरपालिका प्रशासनाचा निष्काळजीपणा, तसेच काम अपूर्ण असताना आणि जोडणी अनाधिकृत जोडणी या युवकांना स्वच्छतेसाठी पाठवण्याची गरज नव्हती. झालेली घटना ही हृदय हेलकावणारी असून अतुलला वाचवण्यासाठी जावेद हा पुढे सरसावला. त्या दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे .या दोन्ही कुटुंबीयांना शासन स्तरावरून जास्तीत जास्त मदत मिळून देण्यासाठी मुख्यमंत्री व सरकारकडे आपण पाठपुरावा करून यांना तातडीने मदत मिळवून देऊ असे ते म्हणाले.
तर माजी आमदार डॉ तांबे म्हणाले की, झालेली घटना ही अत्यंत वाईट आहे यामध्ये नगरपालिका प्रशासनाचा निष्काळजीपणा आहे. काम अपूर्ण असताना ही जोडणी नकोच होते. झालेल्या घटनेचे राजकारण न करता माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून या कुटुंबांना जास्तीत जास्त मदत मिळून दिली जाईल असे ते म्हणाले. तर डॉ जयश्रीताई थोरात यांनी दोन्ही कुटुंबीयांच्या महिलांचे सांत्वन केले. याप्रसंगी शहरातील कार्यकर्ते परिसरातील नागरी महिला युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.