Ahilyanagar News:- काल धांदरफळ गावामध्ये जी काही घटना घडली त्यानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर महिला एकत्र आल्या तसेच उपस्थित जमावाच्या माध्यमातून गाड्यांची तोडफोड आणि जाळपोळ देखील करण्यात आली. या सगळ्या प्रकरणामुळे आता अहमदनगर जिल्ह्यातील एकंदरीत राजकारण मोठ्या प्रमाणावर तापल्याचे पाहायला मिळत आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्या बद्दल जे काही आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आले त्यामुळे थोरात समर्थक प्रचंड प्रमाणात भडकले व त्यांनी आक्रमक होत सुजय विखे यांच्या ताफ्यातील गाड्यांची तोडफोड आणि जाळपोळ देखील केली.

मात्र आता या सगळ्या प्रकरणाचा निषेध सुजय विखे यांच्या लोणी गावात देखील सुरू झाला असून या ठिकाणी निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चामध्ये स्वतः सुजय विखे सहभागी होणार आहेत. या सगळ्या प्रकरणावर बाळासाहेब थोरात यांना प्रश्न विचारण्यात आला व त्यांची पहिलीच प्रतिक्रिया या सगळ्या प्रकरणावर आली आहे.
काय म्हणाले बाळासाहेब थोरात?
संगमनेर मधील धांदरफळ गावामध्ये घडलेल्या घटनेनंतर गाड्यांची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली या विरोधात आता भाजप देखील आक्रमक होण्याची चिन्हे दिसून येत असून या सगळ्या प्रकरणा विरोधात लोणी गावात निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे व यामध्ये सुजय विखे देखील सहभागी होणार आहेत.
या सगळ्या पार्श्वभूमीवर या मोर्चा संदर्भात बाळासाहेब थोरात यांना प्रश्न विचारण्यात आला व त्यावर त्यांनी सडेतोड शब्दांमध्ये विखे पाटलांवर हल्ला चढवला. यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात यांनी म्हटले की, सुजय विखे यांना काय आंदोलन करायचं ते करावं, जगाला सगळं माहिती आहे.
सुजय विखेचे ढोंग सगळ्यांना माहिती आहे.इतकेच नाही तर त्यांनी केलेले वक्तव्य देखील सगळ्यांना माहिती आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांचा हे वागणं सगळ्यांनी निषेध करण्यासारखं असल्याचे यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात यांनी म्हटले.
पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की,भाषण कोणत्या स्तरावर कराव हे प्रत्येकाने ठरवावे. सूजय विखेच्या कार्यकर्त्यांनी माझी मुलगी जयश्री बद्दल जे गलिच्छ वक्तव्य केलेले आहे त्याचा महाराष्ट्रातून निषेध होत आहे. मी सध्या महाराष्ट्राचा नेतृत्व करतोय त्यामुळे मला माझ्या मतदारसंघातील जनतेने सांगितलं आहे की आम्ही इकडे आहोत.
आम्ही सगळे पाहून घेऊ. त्यामुळे माझे कार्यकर्तेच हे सगळं प्रकरण पाहून घेत आहेत असे देखील त्यांनी या सगळ्या घटनेवर बोलताना म्हटले. इतकेच नाहीतर पुढे त्यांनी म्हटले की, जयश्री सोडा परंतु जगातील कुठल्याही महिला संदर्भात केलेले हे वक्तव्य आहे व प्रत्येकाच्या घरात मुली बाळी आहेत.
एकीकडे लाडकी बहीण योजना म्हणायचं आणि दुसरीकडे असे विचार ठेवायचे. तसेच संगमनेर मधील बोलणाऱ्या नेत्याच्या वक्तव्यावर स्टेजवरील नेतेमंडळी देखील टाळ्या वाजवत होते हे दुर्दैवी असल्याचे देखील त्यांनी म्हटले. म्हणजेच त्यांच्या मेंदूमध्ये हा विचार आहे असे म्हणत बाळासाहेब थोरात यांनी भाजपला देखील बोलताना टार्गेट केले.