आभाळ फाटले; ‘ह्या’ तालुक्यात हजारो हेक्टर पिके पाण्याखाली

Published on -

अहमदनगर Live24 टीम,27 जुलै 2020 :- सध्या राज्यात मान्सून चांगलाच सक्रिय झाला आहे. अहमदनगर जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. राहुरी तालुक्यात झालेल्या जोरदार पावसाने शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून बळीराजा विवंचनेत सापडला आहे.

कोरोना महामारीने शेतकऱ्यांना कोलमडून टाकले आहे. त्याच्या पाठीशी लागलेले शुक्लकाष्ट संपण्याचे नाव घेत नाही. आता जोरदार पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.

राहुरी तालुक्यात मागील आठवड्यात सलग दोन दिवस झालेल्या दमदार पावसामुळे खरीप पिकांची चांगलीच दाणादाण उडाली. मका, कपाशी, ऊस, सोयाबीन पिकाचे नुकसान होऊन उभी असलेले पिके भुईसपाट झाले आहे.

या पावसामुळे येथील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. रात्रभर सुरू असलेल्या पावसाने कुठे शेतात पाणी साचले. तर कुठे बाजरी पीक भूईसपाट झाले. परिसरातील बाजरी, भुईमूग, मका, ऊस, जनावरांचा चारा आदी पिकांमध्ये पाणी साचले.

त्यामुळे शेतकर्‍यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. राहुरी तालुक्याच्या पश्चिमेकडील ताहाराबाद महसूल मंडलात अतीव पाऊस झाला. त्यामुळे कडधान्याची पिके सडून गेली.

हा परिसर कडधान्याचे आगार म्हणून ओळखला जातो. हुलगे, मूग, तूर, भूईमूग, मठ, तीळ, हावरी, या पिकांसह बाजरी, सोयाबीन, कपाशी, लालकांदा ही पिके अतीव पावसामुळे सडून गेली आहेत.

कोरोना आणि आता अतीव पावसाच्या चक्रव्युहात अडकलेल्या शेतकर्‍यांना तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी माजी नगराध्यक्ष बाळासाहेब चव्हाण, चैतन्य दूध उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश भांड,

रिपाइंचे जिल्हाध्यक्ष सुरेेंद्र थोरात, छावा शेतकरी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सतीश सौदागर, मराठा एकीकरण समितीचे समन्वयक देवेंद्र लांबे, सत्यवान पवार, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र गुंड, दिलीप हारदे, आदींसह शेतकर्‍यांनी केली आहे.

    • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

[email protected]

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News