मुंबई: मे च्या शेवटच्या आठवड्यामध्ये विदर्भात उष्णतेची लाट येईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. येत्या 3 दिवसात विदर्भवासीयांना उन्हाचे तीव्र चटके बसणार आहेत.
सरासरी कमाल तापमानापेक्षा पारा जास्त राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातही 40 अंश सेल्सियसपर्यंत तापमान राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
23 ते 25 मे पर्यंत विदर्भात उष्णतेची लाट येणार असल्यानं हवामन विभागाकडून सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. हवामानात सातत्याने होणाऱ्या बदलामुळे तज्ज्ञांनी हे मत व्यक्त केलं आहे.
19, 20 मे रोजी विदर्भातील काही भागांमध्ये तापमानाचा पारा वाढला होता. तर प. बंगाल, ओडिसामध्ये अम्फान चक्रीवादळानं थैमान घातलं आहे.
मे महिन्याच्या सुरुवातीच्या राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस पडला होता. महाराष्ट्र राज्यात मागच्या काही आठवड्यांमध्ये दक्षिण मध्य महाराष्ट्र मराठवाडा तसेच कोकण भागांमध्ये अवकाळी पाऊस पडल्याने मोठ्या प्रमाणात पिकाचे नुकसान झालं होतं. त्यानंतर अचानक तापमानात वाढ झाली होती.
जळगाव, परभणी, नांदेड, सोलापूर, औरंगाबाद या शहरात गेल्या काही दिवसात कमाल तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसच्यावर गेला तर काही शहरात 43, 44 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
महाराष्ट्रासोबतच देशातील अनेक ठिकाणी तापमान कमालीचं वाढण्याची शक्यता आहे. पश्चिम राजस्थान, पश्चिम गुजरात, सौराष्ट्र, मध्य प्रदेश काही भागात ही येत्या तीन दिवसात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रामधील बरोबरच देशात देखील उष्णतेची लाट पुढील तीन दिवस दिसणार आहे राजस्थानमध्ये पश्चिम राजस्थान भाग तसेच पश्चिम गुजरात सौराष्ट्र पश्चिम किनारपट्टी कर्नाटक या भागांमध्ये सुद्धा उष्णतेची लाट दिसणार असून सरासरीपेक्षा अधिक तापमान वाढेल मध्यप्रदेश मध्ये देखील उष्णतेची लाट याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पश्चिम बंगाल, कोलकाता आणि ओडिशा इथे मात्र अम्फान चक्रीवादळामुळे गेल्या 4 दिवसांत मोठ्या प्रमात नुकसान झालं आहे.