अहमदनगर जिल्ह्यात कोरोना मृत्यूचे तांडव! चोवीस तासात तब्बल 102 कोरोना बाधितांचा मृत्यू…

अहमदनगर Live24 टीम, 18 एप्रिल 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात शहरासह अनेक तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मृतांची संख्याही दिवसेंदिवस वाढत असल्याने चिंतेत भर पडली आहे.

अहमदनगर जिल्ह्यात कोरोना विषाणूने मृत्यूचे तांडव घातले आहे. दर दिवसाला मृत्यूंच्या आकड्यांचा नवा विक्रम तयार होत आहे. अवघ्या चोवीस तासांत १०२ जणांचा बळी कोरोनाने घेतला आहे.

वेळेत उपचारासाठी नागरीकांचा हलगर्जीपणा आता त्यांच्याच जीवावर उठत असून, कोरोनाचा वाढलेला फैलाव अन्‌ काही अंशी आरोग्य यंत्रणेच्या त्रुटींमुळे रुग्णांची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. रुग्ण प्रचंड वाढल्याने येथील शासकीय व खासगी दवाखाने फुल्ल झाले आहे.

नागरिक त्रास जाणवू लागल्यावर पहिल्या टप्प्यात उपचार घेण्याकडे दुर्लक्ष करत असून, तब्येत खालावल्यावर किंवा ऑक्सिजन कमी झाल्यावरच थेट हॉस्पिटल गाठत असल्याने रुग्ण गंभीर होण्याचे व दगावण्याचे प्रमाण जास्त असल्याचा दावा होत आहे.

अहमदनगर जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा वाढत असताना आता मृत्यूंचे तांडव सुरू झाले आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसोबतच अमरधाममधील अंत्यविधी करणारी यंत्रणाही कोलमडली आहे.

शहरातील विद्युतदाहिनीची व्यवस्था आणि ओटेही अपुरे पडत असल्याने जमिनीवरच मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे. मागील चोवीस तासात तब्बल 102 कोरोना बाधितांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

कोरोना बाधित रुग्णवाढीच्या बाबतीत नगर जिल्हा देशातील टॉप टेन जिल्ह्यांमध्ये आहे. दिवसाला येथे तीन हजारांवर नवे रुग्ण आढळून येत असून उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या वीस हजारांच्या घरात गेली आहे.

कोरोना प्रकोप सुरु झाल्यानंतर आतापर्यंत १५८२ जणांचा मृत्यू झाला आहे. करोनामुळे दररोज होणाऱ्या मृत्यूंची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने चिंता व्यक्त होत आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe