Weather Update : यंदाचे वर्ष महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मोठं कष्टदायक सिद्ध होत आहे. खरीप हंगामाच्या सुरुवातीपासून संकटाचा सामना करत असलेल्या बळीराजांमागील संकटांचीं मालिका अजूनही पूर्णपणे थांबलेली दिसत नाही. जून, जुलै आणि ऑक्टोबर महिन्यात निसर्गाच्या लहरीपणाचा बळीराजाला मोठा फटका बसला आहे.
दरम्यान आता गेल्या तीन-चार दिवसांपासून राज्यात ढगाळ वातावरण तयार झाले आहे. काही जिल्ह्यात पाऊस देखील बरसला आहे. आता मंदोस चक्रीवादळाचा देखील महाराष्ट्राचा फटका बसण्याची दाट शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता असल्याचे भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

याचा महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीवर सर्वाधिक प्रभाव पाहायला मिळणार आहे. या चक्रीवादळामुळे उद्या कोकणात पावसाची शक्यता आहे. सध्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दक्षिण कोकणातील जिल्ह्यात ढगाळ वातावरण कायम असून कोकणात हवामान विभागाने उद्या पावसाची शक्यता असल्याचे म्हटले आहे.
त्यामुळे साहजिकच कोकणवासीयांना या पावसाचा फटका बसणार आहे. या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात थंडीचा जोर कमी झाला असून आगामी आठवडाभर थंडी कमी राहणार असल्याचे सांगितले जात आहे. तापमानात दोन ते चार अंश सेल्सियस एवढी वाढ होणार असल्याचे हवामान तज्ञ नमूद करत आहेत.
या चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका तमिळनाडू आणि पदुच्चेरीला बसणार आहे. या दोन्ही राज्यात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. आयएमडीने तामिळनाडू राज्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तामिळनाडूमधील काही जिल्ह्यात आज शाळांना सुट्टी देखील देण्यात आली होती. उद्या तामिळनाडूमधील एकूण बारा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी झाला आहे.
चक्रीवादळाची पार्श्वभूमी लक्षात घेता नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले जात आहे. महाराष्ट्रात या चक्रीवादळाचा प्रभाव हा कोकण किनारपट्टीवर जाणवणार आहे. उर्वरित महाराष्ट्रात याचा फारसा प्रभाव राहणार नाही. तरी देखील महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात थंडीचा जोर कमी झाला असून काही ठिकाणी ढगाळ वातावरण तयार झालं आहे.