Maharashtra News : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान झाले पाहिजेत. त्यांच्यामुळे देश सशक्त होतोय. त्यामुळे मोदी हेच पंतप्रधान होतील यासाठीच सर्व भाजप कार्यकत्यांनी लोकसभेचा उमेदवार कोण असेल
हे पाहण्यापेक्षा जो कोणी पक्षाचा उमेदवार असेल त्यासाठी काम करावे असे आवाहन खा. सुजय विखे यांनी केले. तसेच केवळ फोटो वापरून आणि आरोप करून जनतेची दिशाभूल करण्याचे दिवस गेले आहेत असाही टोला विरोधकांना लगावला.
शुक्रवारी पाथर्डी येथील जुन्या पोलिस वसाहत येथे पोलिस वसाहत व पोलिस स्टेशन इमारतीच्या कामाचे उद्घाटन विखे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी विखेंनी हे प्रतिपादन केले. या कार्यक्रमावेळी भाजपच्या आमदार मोनिका राजळे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, सहायक पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे आदींसह अनेक नागरिक उपस्थित होते.
राजकारणात संधी महत्त्वाची
राजकारणात संधी फार महत्त्वाची असते. ती मिळाल्यानंतर तिचा जनतेसाठी उपयोग केला पाहिजे. याचा चांगला उपयोग करणे यावर लोकप्रतिनिधीचे भविष्य अवलंबून असते. शहरात आणखी शंभर बेडचे ऊस तोडणी कामगारांच्या मुलांसाठी त्यांच्या शिक्षणासाठी दोन वस्तीगृह मंजूर करण्यात आलेले आहेत.
अध्यक्ष कर्डिले यांच्या माध्यमातून साखर कारखानदांची बँक बचत गट होण्याचे काम झाले. राष्ट्रीय महामार्गाचे रखडलेले काम हे आमच्या मुळेच झाले आहे. ठेकेदार अनेक वेळा बददले गेले तरी देखील काम पूर्ण करण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही सतत पाठपुरावा केला असे खा. विखे यावेळी म्हणाले.
नव्याने दोन पोलिस ठाणे करणार : आ. राजळे
पोलिस वसाहत व पोलिस स्टेशनच्या इमारतीसाठी गेल्या पाच वर्षांपासून पाठपुरावा सुरू होता. तालुक्यातील लोकसंख्या आणि क्षेत्रफळ पाहता नव्याने दोन पोलिस स्टेशनची आपल्याला गरज आहे. त्यासाठी आपण स्वतः तसेच खासदार विखे, माजी मंत्री कर्डिले हे देखील राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करू, असे आमदार मोनिका राजळे यावेळी म्हणाल्या.
केंद्र व राज्याच्या निधीतून जिल्ह्याचा विकास
यावेळी बोलताना आ. शिवाजी कर्डिले म्हणाले, केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना व निधी नगर जिल्ह्यात आला आहे. त्यामूळे नगर जिल्ह्याचा विकास झाला आहे. राष्ट्रीय महामार्ग २२२ या रस्त्याचे अनेक वर्षापासून असलेले प्रलंबित रस्त्याचे काम खासदार सुजय विखे व आमदार मोनिका राजळे यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावून पूर्ण केले आहे. यातूनच नगर जिल्ह्याचा विकास होत आहे.