प्रेमाचं एक अमर स्मारक ताजमहाल पाहण्यासाठी जगभरातून लाखो लोक दरवर्षी भारतात येतात. पण या शुभ्र संगमरवरी महालाच्या आत काही अशा गोष्टी लपलेल्या आहेत, ज्या केवळ त्याच्या सौंदर्यामुळे नव्हे, तर रहस्यांमुळेही लोकांना अचंबित करतात. त्याच्या भव्यतेच्या मागे अनेक अनुत्तरित प्रश्न आहेत. त्यापैकी एक सर्वाधिक चर्चेचा विषय म्हणजे ताजमहालच्या तळघरात असलेल्या 22 बंद खोल्या – ज्या आजही सामान्य जनतेसाठी बंद ठेवल्या जातात.
‘त्या’ बंद खोल्यांच्या आत आहे तरी काय?
या खोल्यांचं स्थान आणि त्यामागचं गूढ आजही हजारो लोकांच्या मनात उत्सुकता निर्माण करतं. या खोल्या मुख्य समाधीच्या खाली असलेल्या तळघरात आहेत. त्यापैकी चार खोल्या मोठ्या आहेत, आणि उर्वरित अठरा लहान. हे तळघर ताजमहालच्या जमीनीखाली असून, जिथे काही विशिष्ट व्यक्तींनाच जाण्याची परवानगी मिळते. पुरातत्व विभागाने या दरवाज्यांना सील करून ठेवलं आहे, आणि त्यामागचं कारण स्पष्ट नसलं तरी, सुरक्षितता आणि ऐतिहासिक ठिकाणाच्या संवर्धनाचा मुद्दा पुढे केला जातो.

वास्तविक पाहता, या दरवाज्यांना पाहिलं तर त्यांच्या चौकटींमध्ये पूर्वी लाल दगड बसवलेला होता. नंतर ते विटांनी पूर्णपणे बंद करण्यात आले. त्यामुळेच अनेक जणांचा असा कयास आहे की, त्या आत काहीतरी फार महत्त्वाचं लपवलेलं असावं – कदाचित शाही खजिना, जुने कागदपत्रं किंवा अगदी शाहजहान आणि मुमताजच्या मूळ कबरीसुद्धा.
इतकंच नाही, तर ताजमहालच्या चारही बाजूंना असलेल्या उंच मिनारांकडे जाणारा मार्गही बंद करून टाकण्यात आला आहे. हे मिनार घुमटाला आधार देतात, पण आत जाण्याचा मार्ग आजही सामान्य पर्यटकांसाठी बंद आहे. काही तज्ज्ञांच्या मते, ही बंदी संरचनेच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक होती.
बंद खोल्यांबाबतच्या दंतकथा-
या बंद खोल्यांबाबत अनेक दंतकथा ऐकायला मिळतात. काही लोक मानतात की ब्रिटिश काळात या दरवाज्यांमागे खजिना शोधण्यासाठी मोहीमा राबवण्यात आल्या होत्या. त्यानंतर संरक्षणाच्या नावाखाली हे दरवाजे कायमचे बंद करण्यात आले. आजही लोकांचा विश्वास आहे की आत सोनं, चांदी आणि मोलाची कागदपत्रं असू शकतात. काहींचा तर ठाम दावा आहे की, ज्या कबरी आपण वर पाहतो, त्या केवळ प्रतीकात्मक असून, खऱ्या समाध्या या गूढ खोल्यांत दडलेल्या आहेत.
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने याबाबत कायम संयम बाळगलेला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, या खोल्या उघडल्यास इमारतीचा पाया कमकुवत होण्याची शक्यता आहे. शिवाय, हवामान व प्रदूषणापासून रक्षण करण्यासाठीही त्या बंद ठेवणं आवश्यक आहे.
आज विज्ञानाच्या आणि तंत्रज्ञानाच्या युगात आपण अदृश्य गोष्टी तपासू शकतो. त्यामुळे भविष्यात कदाचित हे दरवाजे उघडले जातील, किंवा कमीतकमी त्यामागचं सत्य काही यंत्रांच्या साहाय्याने जगासमोर येईल.