Shirdi News : शिर्डी विमानतळ प्रवासी टर्मिनलसाठी ५२७ कोटी !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Shirdi News : कोपरगाव मतदार संघातील साईबाबा आंतरराष्ट्रीय श्री विमानतळाच्या विकासाला चालना देवून विमान तळ विकासाचे उर्वरित प्रश्न सोडविण्यासाठी आ. आशुतोष काळे यांच्या प्रयत्नातून २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात प्रवासी टर्मिनलसाठी ५२७ कोटी निधी मंजूर करण्यात आला होता.

त्याची महायुती शासनाने तातडीने अंमलबजावणी करून या प्रवासी टर्मिनलच्या ५२७ कोटीच्या कामाची निविदा प्रसिद्ध केल्याची माहिती आ. काळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

देशातील धार्मिक देवस्थानामध्ये दुसऱ्या क्रमांकाच्या शिर्डी येथील श्री साईबाबांच्या देश विदेशातील असंख्य साईभक्तांना शिर्डीला येणे सोयीस्कर व्हावे व त्यांचा वेळ वाचावा व मतदार संघातील दुष्काळी परिसर असलेल्या काकडी व परिसराचा विकास व्हावा, या उद्देशातून माजी आमदार अशोक काळे यांच्या कार्यकाळात कोपरगाव मतदार संघातील काकडी येथे विमानतळ उभारण्यात आले होते.

या विमानतळाचे सन २०१७ साली लोकार्पण झाल्यापासून या विमानतळावरून विमानांचे उड्डाणासाठी अनंत अडचणी येत होत्या. विमानतळावर डीव्हिओआर अर्थात कमी दृष्यमानतेवर मात करणारी ‘डॉपलर व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी ओमनी रेंज’ सेवा बंद असल्यामुळे नाईट लँडिंग सुविधा देखील बंद होती, अशा अनेक अडचणींच्या चक्रव्युहात काकडी विमानतळ सापडले होते.

त्याबाबत आ. काळे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. अजित पवार यांच्याकडे सातत्याने हे प्रश्न मांडले होते अनेकवेळा मंत्रालयात बैठका देखील घेतल्या होत्या. श्री साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या देश विदेशातील साईभक्तांना काकडी विमानतळावर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयी-सुविधा मिळाव्या, कार्गो सेवा सुरू व्हावी. नाईट लँडिंग सुविधा सुरू व्हावी. तसेच काकडी व परिसराचे प्रश्न सुटावेत, यासाठी आ. काळे यांनी काकडी विमानतळासाठी १५० कोटी निधी मिळविला.

महायुती शासनाने २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात प्रवासी टर्मिनलसाठी ५२७ कोटी निधीस मजुरी दिली होती. या निधीतून होणाऱ्या प्रवासी टर्मिनलच्या कामाची निविदा प्रसिद्ध झाली आहे. लवकरच प्रत्यक्षात कामास प्रारंभ होवून शिर्डी विमानतळाच्या समस्या सुटणार असून काकडी परिसराचा वेगाने विकास मदत होणार असल्याचे आ. काळे यांनी म्हटले असून तातडीने अंमलबजावणी केल्याबद्दल मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांचे आभार मानले.