गोर-गरीबांची घरे खाली करण्याची सुपारी घेणार्‍या त्या महिला पदाधिकारी व जागा मालकावर कारवाई व्हावी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 25 सप्टेंबर 2021 :- जागा खाली करण्याची सुपारी घेऊन एक राजकीय महिला पदाधिकारी पाईपलाईन रोड, समर्थ नगर येथे वास्तव्यास असलेल्या भटक्या विमुक्त समाजातील कुटुंबियांना धमकावून राहते घर खाली करण्यासाठी धमकावत आहे.

या पिडीत कुटुंबीयांना संरक्षण देऊन जागा मालक व महिला पदाधिकारीवर कारवाई करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (गवई गट) वतीने करण्यात आली आहे.

या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले. यावेळी युवक जिल्हाध्यक्ष पवन भिंगारदिवे, शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, शहर कार्याध्यक्ष दानिश शेख, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष नईम शेख, शहर प्रवक्ता जमीर इनामदार, शहर कार्याध्यक्ष आजीम खान आदी उपस्थित होते.

सावेडी, पाईपलाईन रोड, समर्थ नगर येथील एका जागेत राम माने व लक्ष्मण माने अनेक वर्षापासून राहत आहे. मोलमजुरी आणि रखवालीचे काम करुन ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे.

काही महिन्यांपासून शहरातील तथाकथित राजकीय पक्षाची पदाधिकारी असलेली गुंड प्रवृत्तीच्या महिलेने ही जागा खाली करुन घेण्याची जागा मालकाकडून सुपारी घेतली असल्याचा आरोप माने कुटुंबीयांनी केला आहे.

राहत्या घरातून माने कुटुंबीयांना बाहेर काढून सदर जागा ताब्यात घेण्यासाठी 15 सप्टेंबर रोजी सदर महिलेने गुंड प्रवृत्तीचे लोक व काही पोलिस आणून सदर जागेची नोटरी केलेली असल्याचे सांगितले. तर घर ताबडतोब खाली करण्यासाठी दमबाजी केली. तसेच जेसीबी लावून घर पाडून टाकण्याच्या धमक्या दिल्या.

याबाबत नीता माने यांनी पोलिस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली. मात्र त्यांची दखल घेण्यात आलेली नाही. तक्रारदार महिला गर्भवती असून, तिला व कुटुंबीयांना घर खाली करण्यासाठी वारंवार धमकवले जात आहे.

घर खाली करण्यासाठी धमकावणार्‍या व्यक्तींकडे असलेल्या कागदपत्रांची कायदेशीर तपासणी करुन पिडीत कुटुंबीयांना राहत्या घरातून बेघर होण्यापासून वाचविण्याचे निवेदनात म्हंटले आहे. गुंड प्रवृत्तीच्या लोकांना तात्पुरत्या स्वरूपाच्या नोटरी दस्त देऊन समाजामध्ये गुन्हेगारीला चालना देण्याचे काम सदर जागा मालक करीत आहे.

जागा खाली करण्याचा कायदेशीर हक्क प्राप्त झाला नसताना देखील केवळ नोटरी दस्ताच्या आधार घेऊन पिडीत भटक्या विमुक्त समाजातील कुटुंबीयांना सुपारी घेऊन धमकाविणार्‍या राजकीय पक्षाची पदाधिकारी असलेली गुंड प्रवृत्तीच्या महिलेवर व जागा मालकावर कारवाई करुन पिडीत कुटुंबीयांना संरक्षण देण्याची मागणी आरपीआयच्या वतीने करण्यात आली आहे. अन्यथा पिडीत कुटुंबीयांसह जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.