नगरच्या पार्श्वभूमीवर शेजारच्या औरंगाबाद जिल्ह्मातील प्रशासन अलर्ट!

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 05 ऑक्टोबर 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्यामुळे ६१ गावांत १३ ऑक्टोबरपर्यंत लाॅकडाऊन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर औरंगाबाद जिल्ह्यात खबरदारी म्हणून पोलीस प्रशासनाला जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सोमवारी सायंकाळी पत्र देऊन चेकपोस्टवरील सुरक्षा वाढविण्याच्या सूचना केल्या आहेत.

शाळा सुरू झाल्या असून, सर्व काही आलबेल असल्यासारखे वाटत असतानाच शेजारच्या जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढू लागल्यामुळे जिल्हा प्रशासन अलर्ट झाले आहे.

अहमदनगरकडून जिल्ह्यात येणाऱ्या सर्व प्रमुख मार्गांच्या चेकपोस्टवर येणाऱ्या प्रवाशांची कडक तपासणी करण्यात येणार आहे.

जिल्ह्यात येण्यापासून कुणाला रोखण्यात येणार नाही, परंतु चेकपोस्टवर प्रवाशांना लसीकरण केल्याबाबत विचारणा करण्यात येईल. तसेच काही आजार आहे की, याची माहिती घेण्यात येईल.

औरंगाबाद जिल्ह्यात सध्या १५३ कोरोनाचे रुग्ण आहेत. मृत्यदर देखील मोठ्या प्रमाणात घटला आहे. परिस्थिती अशीच नियंत्रणात राहावी, यासाठी खबरदारीचे उपाय म्हणून सर्व प्रशासकीय यंत्रणेला सूचना देण्यात आल्या आहेत.