Ahmednagar News : संसार अर्ध्यावरती सोडत एकामागोमाग चार युवकांचा मृत्यू ! सावधानतेचा इशारा, अहमदनगर शोकसागरात

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : मागील काही दिवसांत एकामागोमाग एक झालेल्या दुर्घटनांमुळे अहमदनगर जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. दोन आठवड्यांत शेवगाव तालुक्यातील बोधेगाव परिसरातल्या चार युवकांचा अकाली मृत्यू झालाय.

या घटनेमुळे हे तरुण अकालीच संसारातून उडून गेल्याने कुटुंबाचा आधार हिरावला गेला आहे. ही कुटुंब अक्षरशः कोलमडून पडले आहेत. कुटुंबातील लहान मुले पोरकी झाली आहेत. त्यामुळे परिसरातील तरुणाईला सोशल मीडियातून सावधानता बाळगण्याचे आवाहन केले जात आहे.

मागील महिन्यात शनिवारी (दि. २० एप्रिल) हातगाव येथील सर्वसामान्य कुटुंबातील शेतमजुरी करणारा युवक अण्णा लक्ष्मण गायकवाड (वय २२) याचा कांबी (ता. शेवगाव) येथे जायकवाडी धरणाच्या उजव्या कालव्यामध्ये बुडून मृत्यू झाला.

त्याच्या पश्चात पत्नी, तीन महिन्यांची एक मुलगी व दोन वर्षांचा एक मुलगा आहे. सद्यःस्थितीला त्या कुटुंबाचा मुख्य आधारच हिरावला गेल्याने संपूर्ण कुटुंब उद्धवस्त झाले आहे.

बुधवारी (दि. २४ एप्रिल) बोधेगाव येथील मजुरी काम करत असलेला युवक संदीप लहू खंडागळे (वय ३०) याचे लखमापुरी येथे अवकाळी पावसापासून वाचण्यासाठी विहिरीच्या काठावरील मोठ्या दगडाच्या आडोशाला बसला होता. पावसामुळे दगडाखालील माती खचून दगड अंगावर पडल्याने जागीच मृत्यू झाला.

हातावर पोट असणाऱ्या संदीपच्या घरची परिस्थिती बेताचीच आहे. त्याच्या पश्चात आई-वडील, पत्नी व दोन लहान मुले असल्याने कुटुंबाची वाताहत झाली आहे, तसेच गुरुवारी (दि. २ मे) रोजी हातगाव येथील एका अविवाहित तरुणाचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला.

चारच दिवसांपूर्वी लग्न झालेल्या नागेश बंडू गलांडे (वय २५) याचा जायकवाडी धरणाच्या उजव्या कालव्यामध्ये मृतदेह आढळून आला. एकाच दिवशी घडलेल्या या दोन दुर्दैवी घटनांमुळे संपूर्ण हातगाव गावावर शोककळा पसरली. कुटुंबातील तरुण मुले अकाली हिरावली गेल्यामुळे त्यांचे कुटुंबदेखील कोलमडून पडले आहे.