Ahmednagar News : अर्बन ठेवीदारांना दिलासा ! वसुली झाली पावणे तेरा कोटी, ६० कोटी वितरणाची प्रशासनाकडून ग्वाही

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : गैरव्यवहार व दाखल गुन्ह्यांसह अटक झालेल्या बड्या मंडळींमुळे माध्यमांतून गाजत असलेल्या नगर अर्बन मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँकेच्या ठेवीदारांना थोडा दिलासा मिळाला आहे. नगर अर्बन बँकेची १२ कोटी ७८ लाखांची कर्ज वसुली झाली असून, सुमारे १४ हजारावर ठेवीदारांचे ६० कोटी डिपॉझीट गॅरंटी कॉर्पोरेशनच्या माध्यमातून परत करण्याची प्रकिया अंतिम टप्प्यात असल्याचे बँक प्रशासनाद्वारे जाहीर करण्यात आले आहे.

रिझर्व बँकेने नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचा बँकिंग परवाना रद्द केल्यानंतर केंद्र शासनाने बँकेवर नोव्हेंबर २०२३ मध्ये अवसायक म्हणून एनसीडीसीचे संचालक गणेश गायकवाड यांची नियुक्ती केली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पाच महिन्यांच्या कालावधीमध्ये २३ एप्रिल अखेर बँकेच्या थकीत कर्जापैकी १२ कोटी ७८ लाख रुपये वसूल करण्यात आले आहेत.

पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात १७ हजार २०० ठेवीदारांचे २९३ कोटी ५७ लाख रुपये डिपॉझीट गॅरंटी कॉर्पोरेशनच्या माध्यमातून (डीआयसीजीसी) परत करण्यात आले आहेत. तर १४ हजार ४८५ ठेवीदारांच्या क्लेम फॉर्मची पूर्तता झाली असून त्यांचे ६० कोटी रुपये डीआयसीजीसीच्या माध्यमातून लवकरच परत करण्यात येणार असल्याची माहिती बँक प्रशासनाकडून देण्यात आली.

नवीन आर्थिक वर्षामध्ये थकीत कर्ज वसुलीची प्रक्रिया अधिक तीव्र करण्यात येणार असून थकबाकीत असलेल्या कर्जदारांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. संभाव्य कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी सर्व थकीत कर्जदारांनी आपली थकबाकीची रक्कम लवकरात लवकर भरून बँक प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन अवसायक गणेश गायकवाड यांनी केले आहे.

त्याचबरोबर सर्व खातेदार व ठेवीदार यांनी आपापले केवायसी कागदपत्र बँकेच्या जवळच्या शाखेत जमा करून ठेवी परत मिळवण्यासाठी क्लेम फॉर्म देखील लवकरात लवकर भरून द्यावेत, असे आवाहन देखील गायकवाड यांनी केले आहे. थकीत कर्जाची वसुली करून ठेवीदारांना त्यांचे पैसे परत करण्यासाठी बँक प्रशासन प्रयत्नशील असल्याचेदेखील गायकवाड यांनी सांगितले.