बिबट्याच्या दहशतीने बळीराजाची पिके पाण्याअभावी सापडली अडचणीत

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 28  डिसेंबर 2021 :- राहाता तालुक्यात दोन दिवसांपुर्वी शेतात पाणी भरत असलेल्या शेतकर्‍यावर बिबट्याने हल्ला केला, त्यांना जखमी केले. त्या आगोदर पिंप्रीलोकई भागातील अनेक वस्त्यांवरील कुत्रे या बिबट्याने फस्त केले.(terror of leopards)

त्यामुळे बिबट्याच्या वावराने शेतकरी धास्तावला आहे. शेतातील उभ्या पिकात बिबट्या दबा धरुन बसतोय. यामुळे तालुक्यातील अनेक भागात बिबट्याची प्रचंड दहशत पसरली आहे.

दरम्यान शेतात शेतीची कामे सुरु आहे. विज वितरण कंपनीचे शेतीसाठी रात्री विज देते. यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहे. पिके उभी आहेत, मात्र बिबट्याच्या भितीने शेतकर्‍यांनी शेतात रात्री पिकांना पाणी थांबविले आहे.

त्यामुळे पिके धोक्यात आली आहेत. याबाबत पिंप्रीलोकई येथील प्रयोगशील शेतकरी सुभाष गडगे म्हणाले, पिंप्रीलोकई, केलवड आणि आडगाव येथील शेतकरी बिबट्याच्या मुक्त संचारामुळे धास्तावले आहेत.

आपल्या शेतातील द्राक्षे पीक धोक्यात आले आहे. या द्राक्षांची काढणी महिन्यावर आली आहे. मका, हरबरा, कांदे हे पिके शेतात उभी आहेत. रात्री आम्हाला शेतीसाठी विज मिळते.

पण बिबट्याच्या धास्तीने शेतात पाणी भरण्यास जाता येत नाही. परिणामी हाता तोंडाशी आलेला घास अडचणीत येत असल्याने मोठा मनस्ताप होत आहे. या बिबट्याला वनविभागाने पिंजरा लावून जेरबंद करावे, अशी मागणी होऊ लागली आहे.