तहसील कार्यालयासमोर सोयाबीन ओतून केंद्र सरकारचा निषेध

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 28 सप्टेंबर 2021 :-  केंद्र सरकारने केलेले कृषी कायदे मागे घ्यावेत, तसेच सोयाबीनची आयात बंद करावी, या मागण्यांसाठी किसान सभेसह विविध संघटनांनी एकत्र येत अकोले येथे आज तहसील कार्यालयासमोर सोयाबीन ओतून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.

केंद्र सरकारच्या धोरणांमुळे सोयाबीनचे दर कोसळले आहेत, असा आरोप करत किसान सभा व शेतकरी संघटनांनी आंदोलनाची हाक दिली होती.

या आंदोलनाला महापालिका कामगार संघटनांसह विविध कामगार संघटना व शेतकरी संघटनांनी प्रतिसाद दिला. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील जनजीवनावर परिणाम झाला होता.

किसान सभेसह विविध संघटनांनी एकत्र येत किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांच्या उपस्थितीत अकोले तहसील कार्यालयावर मोर्चा काढून घोषणाबाजी केली.

सोयाबीन तहसील कार्यालयासमोर ओतून, केंद्र सरकारने घेतलेल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या विरोधातल्या भूमिकेचा निषेध केला. सोयाबीनचे दर 11 हजार 111 रुपयांवरून चार हजारांवर आल्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत.

केंद्र सरकारने सोयाबीन हंगामाच्या तोंडावर 12 लाख टन जीएम सोया पेंड आयात करण्याचा निर्णय घेतल्यामुळे दरात घसरण झाली. हा निर्णय मागे घेण्यात यावा व सोयाबीनउत्पादकांना न्याय द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.