अहमदनगरमध्ये कोरोना पाय रोवतोय; यांनी दिले नियमांची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2022 :-  कोविडचा वाढता संसर्ग आणि ओमिक्रॉनच्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने निर्बंध आधिक कडक केले आहेत.

तसे आदेश लागू केले असून त्यानुसार अहमदनगर जिल्ह्यातही जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सोमवारी आदेश काढले आहेत.

निर्बंधाचे आदेश लागू होताच त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकार्‍यांना दिले आहेत.

गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्यातील करोना रूग्णसंख्येत वेगाने वाढ होत आहे. तीन महिन्यापासून शंभरच्या आत असलेली रूग्णसंख्या आठ दिवसांमध्ये वाढली आहे. सोमवारी 244 रूग्णसंख्या होती.

मंगळवारी 408 रूग्णांना करोना संसर्गाचे निदान झाले. रूग्णसंख्या वाढत असताना उपचार सुरू असणार्‍या रूग्णांमध्ये वाढ झाली आहे. कोविड वाढत असताना ओमिक्रॉनचा धोका आहे. या पार्श्‍वभूमीवर निर्बंध आधिक कडक करण्यात आले आहे.

निर्बंध लागू केले तरी त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. सार्वजनिक ठिकाणी नागरिकांची गर्दी होत आहे. दिवसा जमावबंदी व रात्री संचारबंदी असतानाही अहमदनगर शहरासह जिल्ह्यात त्याची अंमलबजावणी होत नाही. लग्न समारंभ, बाजारपेठा यासह सार्वजनिक ठिकाणी नागरिक गर्दी करत आहे.

नागरिकांकडून सामाजिक अंतराचे पालन केले जात नाही. मास्कचा वापर केला जात नसल्याने कोविड रूग्णांत वाढ होत आहे. यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकार्‍यांना हद्दीमध्ये कोविड नियमांची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत.

दिवसा जमावबंदी तर रात्री संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील पोलिसांनी आपआपल्या हद्दीत नाकाबंदी करून व गस्त घालून निर्बंधाची अंमलजबावणी करण्याचे आदेश दिले आहेत.

त्यामुळे पोलिसांनी नाकाबंदी करून विनामास्क करवाईवर भर दिला आहे. तसेच आस्थापना, बाजारपेठांमधील गर्दीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी पोलिसांवर आली आहे.