‘त्यांच्या ‘ प्रयत्नामुळे दहा एकर ऊस वाचला अन्यथा…!

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 09 जानेवारी 2022 :- एकीकडे निसर्गाचा लहरीपणा तर दुसरीकडे शेतमालाला मिळत असलेला अत्यल्प भाव या दुहेरी संकटात सापडलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यापुढे आता आणखी एक संकट उभे ठाकले आहे.

अनेकदा तोडणीला आलेल्या उसाला आग लावण्याच्या घटना घडत आहेत. नुकतीच कर्जत तालुक्यातील टाकळी खंडेश्वरी येथे शॉर्टसर्किटमुळे आग लागून दोन एकर ऊस जळून खाक झाला.

या आगीत शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. मात्र परिसरातील नागरिकांच्या प्रयत्ना मुळे तब्बल दहा एकर ऊस या आगीपासून वाचला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी, टाकळी खंडेश्वरी येथे दशरथ पवार यांच्या शेतातील उसाला शॉर्टसर्किटने आग लागली. परंतु ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे ही आग त्वरित विझविण्यात यश आल्याने मोठा अनर्थ टळला.

शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या या आगीत दोन एकर उसाचे क्षेत्र जळून खाक झाले. ग्रामस्थांनी केलेल्या विशेष प्रयत्नांमुळे शेजारी असलेला दहा एकर ऊस वाचविण्यात यश आले. नुकसानग्रस्त शेतकऱ्याला शासनाने आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.