विजेच्या लपंडावामुळे नागरिकांसह शेतकरी हैराण

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : कोपरगाव तालुक्यात तापमान ४०-४१ अंशापर्यंत पोहचले आहे. सूर्य आग ओकत असल्याने तापमानाचा ज्येष्ठ नागरिकांसह लहान मुलांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. त्यातच चांदेकसारे, घारी,

सोनेवाडी, देर्डे कोऱ्हाळे, डाऊच बुद्रुक आदीसह पोहेगाव परीसरात मागील काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. रात्री-अपरात्री वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांसह, शेतकरी वर्ग हैराण झाले आहे.

चांदेकसारे आदीसह आजूबाजूच्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून सकाळपासूनच वीजपुरवठा न सूचना देता खंडित केला जात आहे. साधारणतः पाच ते सात तासांपर्यंत वीजपुरवठा खंडित होत आहे. ग्रामीण भागात भुरट्या चोऱ्या वाढल्याने शेतकरी हैराण झाले आहेत.

पाणी टंचाईमुळे साठवण केलेले पाणी वापरता येत नाही. बोअरवेल चालू करता येत नसल्याने पाण्याच्या प्रश्न उद्भवत आहे. पाण्याअभावी महिला वर्गाची कामे रखडतात. तर बँकांमध्ये कामासाठी आलेल्या लोकांना झेरॉक्स, संगणकावरील कामासाठी तासनतास किंवा दोन-दोन दिवस चकरा माराव्या लागत आहेत. त्यामुळे अनेकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

सकाळी आठ वाजल्यापासून उन्हाची तीव्रता जाणवत आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे लोक घराच्या बाहेर पडायला तयार नाहीत, त्यातच वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे घरातील विजेची उपकरणे बंद पडतात.

पंखा, कुलर, चालत नसल्याने लोकांना खास करून वयोवृद्ध व लहान मुलांचा जीव कासावीस होत आहे. टीव्ही व मोबाईलला चार्जिंग नसल्यामुळे करमणुकीचे ही साधने बंद पडत असल्याने लहान खेळकर मुले बाहेर पडून उन्हाच्या त्रासाने आजारी पडत आहेत.

सततचे भारनियमन दुरुस्तीच्या कामामुळे व वीज वाहिन्यांच्या खालील झाडे तोडण्याच्या नावाखाली वीजप्रवाह वारंवार खंडित होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. कामाचे नियोजन योग्य पद्धतीने वीज वितरणकडून होत नाही.

त्यामुळे जास्त वेळ वीज पुरवठा खंडित ठेवावा रहातो आणि इतर कारणांमुळे कायमच वीजपुरवठा खंडित होत असतो. देखभालीसाठी सकाळ व सायंकाळची वेळ निवडून किमान ११ ते ४ यावेळेत तरी वीजपुरवठा खंडित करु नये, असे नागरिकांनी बोलून दाखवले.

ऐन उन्हाळ्यात उन्हाच्या झळा सोसाव्या लागत असल्यामुळे लोक आजारी पडू लागली आहेत. आधीच दुष्काळ, पाणी नाही, त्यातच या विजेच्या लंपडावाने दवाखान्याचा खर्च परवडणारा नाही. वीज पुरवठा बंद आहे तो कधी सुरू होईल,

यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे नागरिकांनी विचारणा केली असता वीज वितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचारी वर्गाकडून नागरिकांना योग्य व समर्पक उत्तरे मिळत नाहीत. उडवाउडवीची उत्तरे दिली जातात, अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत. कामाचे योग्य नियोजन होत नाही, असे चित्र समोर आले आहे.

वीज पुरवठा बंद करण्याचे वेळापत्रक वीज वितरण कंपनीने प्रसिद्ध करून नागरिकांना याची आगाऊ कल्पना देणे गरजेचे असताना तसे मात्र होत नाही आणि मनमानी पद्धतीने वीजपुरवठा खंडित केला जातो, असे चित्र निर्माण झाले आहे.

तातडीने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांमधुन होत आहे. त्यामुळे पूर्ण दाबाने, सुरळीत व अखंडपणे वीजपुरवठा करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.