रात्रीच्या वेळेत कचरा उचलणार्‍या घंटागाड्या पुर्ववत सुरू कराव्या

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 29 सप्टेंबर 2021 :-  शहरातील व्यावसायिक व दुकानदार यांच्या सोयीसाठी कचरा उचलण्यासाठी रात्रीच्या वेळेत सुरू करण्यात घंटागाड्या पुर्ववत सुरू करण्याची मागणी अहमदनगर हॉकर्स सेवा संघाच्या वतीने महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

अन्यथा शहरात साचलेला कचरा महापालिकेत आणून टाकण्याचा इशारा चितळे रोड हातगाडी व भाजीविक्रेते संघटनेचे अध्यक्ष संजय झिंजे व हॉकर्स सेवा संघाचे अध्यक्ष शाकीर शेख यांनी दिला आहे. मागील वीस दिवसांपासून शहरात कचरा उचलण्यासाठी रात्रीच्या घंटागाड्या बंद झालेल्या आहेत.

शहरातील भाजीपाला, फळ विक्रेते, हॉटेल चालक, दुकानदार व इतर व्यावसायिकांना दुकाने बंद करताना साचलेला कचरा नाईलाजास्तव रस्त्यावर अथवा मोकळ्या जागेत टाकावा लागत आहे. पूर्वी कचरा उचलण्यासाठी महापालिकेच्या घंटागाड्या सकाळी व रात्री दोन वेळेस यायच्या.

रात्रीच्या वेळी दुकाने बंद करताना व्यावसायिक जमलेला कचरा घंटागाडीत नियमितपणे टाकत होते. परंतु रात्रीच्या घंटागाड्या बंद झाल्यामुळे शहरात कचर्‍याचे साम्राज्य पसरले आहे. भाजीबाजार, फळबाजार व बाजारपेठ असलेल्या ठिकाणी दुकानदार मोकळ्या जागेत कचरा टाकत असल्याने शहरात कचर्‍याचे ढीग लागले आहेत.

परिणामी याचा परिसरात राहत असलेल्या सर्वसामान्य नागरिकांना त्रास होत असून, परिसरात कचर्‍यामुळे दुर्गंधी पसरुन नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

तसेच शहरात सध्या डेंग्यू, चिकनगुनियाची साथ सुरू असून, नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महापालिकेने शहरासह उपनगरात जिथे जिथे बाजार भरतो तेथे, हॉटेल व व्यावसायिक बाजारपेठेत रात्रीच्या वेळी कचरा उचलणार्‍या घंटा गाड्या सुरु करण्याची मागणी अहमदनगर हॉकर्स सेवा संघाच्या वतीने करण्यात आली आहे.

निवेदनावर रामभाऊ धोत्रे, अरुण खिची, रत्नाकर कोंडके, राजेंद्र चौधरी, बालाजी गौरी, मोहंमद शेख, राजू ढोरजे, आसाराम लांडे, सुनंदा ताठे, रामभाऊ केळकर, विठ्ठल रेणुकादास, राजेंद्र धाडगे आदी दुकानदार व्यावसायिकांच्या स्वाक्षर्‍या आहेत. शहरात स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे.

कचरामुक शहर नसून कचरायुक्त शहर बनले आहे. याकडे महापालिकेचे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष असल्याने शहरात साथीचे आजार पसरले आहेत.

महापालिकेचे आयुक्त नागरिकांना नागरी सुविधा देण्यास अपयशी ठरले असून, आयुक्तांनी राजीनामा देऊन सेवानिवृत्तीची विश्रांती घ्यावी. -संजय झिंजे (अध्यक्ष, चितळे रोड हातगाडी व भाजीविक्रेते संघटना)