२४ फेब्रुवारी २०२५ श्रीरामपूर : श्रीरामपूर नगर परिषदेने हाती घेतलेल्या अमृत २ विस्तारित पाणीपुरवठा योजनेचा भुर्दंड सर्वसामान्य नागरिकांवर नको. शिवाय या योजनेअंतर्गत नळ जोडणीसाठी नागरिकांकडे पैशांची मागणी केली जात असल्याच्या तक्रारी प्राप्त होत असल्याचा खुलासा आमदार हेमंत ओगले यांनी केला.अशा प्रकारच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आमदार हेमंत ओगले आणि करण ससाणे यांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांची याबाबत भेट घेऊन माहिती दिली.
यावेळी सचिन गुजर, अध्यक्ष अण्णासाहेब डावखर, आशिष धनवटे उपस्थित होते. यावेळी आमदार ओगले म्हणाले, सध्या श्रीरामपूर नगर परिषदेने १७८ कोटींची सुधारित पाणीपुरवठा योजनेचे काम हाती घेतले आहे. परंतु शहरातील नागरिकांना नव्याने नळ जोडणीच्या नावाखाली चार ते पाच हजार रुपयांची मागणी ठेकेदाराकडून होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

याबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण असून मुख्यठेकेदाराने नेमलेले काही ठेकेदार हे नव्याने टाकण्यात आलेल्या लाईनवरून नळ जोडणीसाठी सर्रास हजारो रुपयांची मागणी नागरिकांकडे करत आहे. एकीकडे करोडो रुपयांची योजना राबवायची आणि दुसरीकडे सर्वसामान्य नागरिकांकडून नळ जोडणीच्या नावाखाली हजारो रुपये वसूल करायचे हे कसे चालेल, असा सवालही यावेळी श्रीरामपूरचे आमदार हेमंत ओगले यांनी केला.
पैसे मागितले, तर तक्रार करावी : मुख्याधिकारी
मुख्याधिकारी घोलप यांच्याशी संपर्क साधला असता नागरिकांनी ठेकेदार अथवा त्याने नेमलेल्या माणसांकडे कुठलेही रक्कम नळ जोडणीच्या नावाखाली देऊ नये.अशी कोणी मागणी केल्यास याबाबत तातडीने नगरपरिषदेकडे संपर्क करावा. खात्री करुन सबंधित व्यक्ती विरुद्ध कारवाई करण्यात येईल, असे मुख्याधिकारी घोलप यांनी सांगितले.