अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणार्‍यांना तातडीने शिक्षा देण्याचा स्वतंत्र कायदा करा !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 27 सप्टेंबर 2021 :- 18 वर्षाखालील अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणार्‍यांना तात्काळ अटक करुन न्यायालयातही अशा प्रकारणाचा निकाल तातडीनेच द्यावा. निकालाप्रमाणे संबंधित आरोपींना शिक्षा देण्यासही विलंब करु नये.

व या संबंधी स्वतंत्र्य वेगळा कायदा संमत करुन त्याची अमंलबजावणी व्हावी, अशी मागणी ओबीसी, व्हीजे-एनटी जनमोर्चाचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

‘शक्ती’ कायदा अलिकडेच संमत झाला आहे. त्यानुसार पिडीत महिलांच्या मागणीवरुन गुन्हेगाराला जबर शिक्षा होवू शकते. सध्या महिला विषयक कायदे अधिक सक्षम करायला हवा, त्यानुसार अल्पवयीनसाठी हा कायदा संमत करावा.

देशात दिवसाला रोज 50 – 55 अत्याचाराच्या तर 80-82 हत्येच्या घटना घडतात, असा राष्ट्रीय गुन्हे नोंदणी (एनसीआरबी)चा अहवाल असून, त्याची नोंद घेण्याची गरज आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

18 वयाच्या व त्या खालील मुली या अल्पवयीन असून, या वयात असतांना मुलींना शिक्षण, खेळ, कला आदि क्षेत्रात वावरतांना त्यांना एकांतात गाठून त्यांचा विनयभंग करणे, त्यांच्यावर अत्याचार करणे अशा घटना सातत्याने सर्वत्र घडत असतात.

भितीपोटी अनेक घटनेचा गुन्हा दाखल होत नाही. अशा घटनेची तातडीने दखल घेत अत्याचार करणार्‍यांना अटक करुन न्यायालयात अशा खटल्याचा निकाल तातडीने देऊन गुन्हेगारांना (आरोपींना) तात्काळ शिक्षा दिल्यास अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराला तर आळा बसेल शिवाय स्त्रीयांवरील अत्यांचारात घट होईल आणि गुन्हेगारांवरही वचक बसेल,

असा विश्वास श्री. सानव यांनी व्यक्त केला. स्त्रीयांवरील अत्याचाराच्या घटना दररोज कुठे ना कुठे (राज्यात, देशात) घडत असतात. त्यात अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या घटनांचाही समावेश असतो.

अशा अनेक घटनांचा गुन्हा नोंदविला जात नाही तर ज्या घटनांचा गुन्हा नोंदविला जातो आणि प्रकरण न्यायालयात असते तेथेही निकालाला विलंब लागतो.

म्हणून अशा प्रकरणाचा निकाल तात्काळ होऊन आरोपींना शिक्षा तातडीने मिळाल्यास स्त्रीयांवरील अत्याचाराच्या घटना घडणार नाही. तरी या मागणीची गंभीर व तातडीने दखल घ्यावी, असे बाळासाहेब सानप यांनी निवेदनात म्हटले आहे.