नगर जिल्‍ह्यातील १५ हजार ९५५ शेतक-यांना एकुण १८ कोटी ३६ लाख ६० हजार रुपयांचा विमा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,  11 फेब्रुवारी 2022 :- फळबाग उत्‍पादकांसाठी सुरु करण्‍यात आलेल्‍या प्रधानमंत्री पिकविमा योजने अंतर्गत पुर्नरचित हवामान आधारीत योजनेत नगर जिल्‍ह्यातील १५ हजार ९५५ शेतक-यांना एकुण १८ कोटी ३६ लाख ६० हजार रुपयांचा विमा मंजुर झाला असल्‍याची माहीती खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी दिली.

केंद्र सरकारने वादळ, वारा, पाऊस, अतिवृष्‍टी तसेच दुष्‍काळ यामुळे फळबागांचे होणारे नुकसान विचारात घेवून शेतक-यांसाठी पुर्नरचित हवामान आधारित विमा योजना सुरु केली आहे.

या पिकविमा योजनेत सहभागी झालेल्‍या शेतक-यांना राज्‍य व केंद्र सरकारही आपला हिस्‍सा अंतर्भूत करुन, या विमा योजनेचे संरक्षण देते. खरीप मृगबहार २०२१-२२ या वर्षात नगर जिल्‍ह्यातील विविध तालुक्‍यांमध्‍ये पेरु, डाळींब, सिताफळ, लिंबु, संत्रा, चिक्‍कू या फळांचे उत्‍पादन घेण्‍यात येते.

या उत्‍पादकांनी फळपिक विमा योजनेत सहभाग घेवून विम्‍यासाठी प्रस्‍ताव दाखल केले होते. नगर जिल्‍ह्यातील १५ हजार ५५ शेतक-यांना नैसर्गिक आपत्‍ती, पाऊस, वादळी वारा यामुळे नुकसान झाल्‍यामुळे या विमा योजनेचा लाभ मिळाला असून, या विमा रक्‍कमेपोटी १८ कोटी ३६ लाख रुपयांचा विमा मंजुर झाला असल्याचे खा.डॉ.सुजय विखे पाटील म्‍हणाले.

केंद्र सरकारने वादळ, वारा, पाऊस, पावसातील खंड, दुष्‍काळ यामुळे फळबागांच्‍या होणा-या नुकसानीपासून शेतक-यांना आर्थिक संरक्षा व्‍हावे यासाठी पुनर्रचित हवामान आधारीत फळबाग विमा योजना आणली आहे.

शेतक-यांनी या पीक विमा योजनेत सहभाग घेतल्‍यावर शेतकरी हिश्‍याबरोबर राज्‍य सरकार व केंद्र सरकारही यामध्‍ये शेतक-यांच्‍या वतीने आपला हिस्‍सा टाकत असते.

विमा योजनेत सहभाग घेतलेल्‍या फळबाग उत्‍पादक शेतक-यांना विमा रक्‍कम तातडीने उपलब्‍ध व्‍हावी यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केल्‍यानंतर अडचणीत सापडलेल्‍या शेतक-यांना या मंजुर विमा रक्‍कमेचा मोठा दिलासा मिळाला असल्‍याचे डॉ.विखे पाटील म्‍हणाले.

यामध्‍ये अकोले तालुक्‍यातील ८८१ शेतक-यांसाठी ६७ लाख २० हजार, जामखेड तालुक्‍यातील ४८३ शेतक-यांसाठी ४७ लाख ३९ हजार, कर्जत तालुक्‍यातील ८४४ शेतक-यांसाठी ९५ लाख ८२ हजार, कोपरगाव तालुक्‍यातील ६४३ शेतक-यांसठी ७३ लाख ५४ हजार, नगर तालुक्‍यातील १३३६ शेतक-यांसाठी २ कोटी ७७ लाख ६१ हजार,

नेवासा तालुक्‍यातील ८४ शेतक-यांसाठी १० लाख ८० हजार, पारनेर तालुक्‍यातील ७७५ शेतक-यांसाठी ९४ लाख ५० हजार, पाथर्डी तालुक्‍यातील १६०६ शेतक-यांसाठी १ कोटी ६४ लाख २७ हजार, राहाता तालुक्‍यातील २ हजार ८० शेतक-यांसाठी २ कोटी ४ लाख १० हजार, राहुरी तालुक्‍यातील ६१८ शेतक-यांसाठी ९१ लाख ५५ हजार,

संगमनेर तालुक्‍यातील ४ हजार ३६२ शेतक-यांसाठी ४ कोटी ५९ लाख ३५ हजार रुपये, शेवगाव तालुक्‍यातील ४८० शेतक-यांसाठी ५३ लाख ४७ हजार, श्रीगोंदा तालुक्‍यातील १ हजार ५८७ शेतक-यांसाठी १ कोटी ८३ लाख ६ हजार रुपये,

तर श्रीरामपूर तालुक्‍यातील १७६ शेतक-यांसाठी १३ लाख ८८ हजार रुपये असा जिल्‍ह्यातील १५ हजार ९५५ शेतक-यांना १८ कोटी ३६ लाख ६० हजार रुपयांचा विमा मंजुर झाल्‍याचे खा.डॉ.विखे पाटील यांनी सांगितले.