सणासुदीच्या काळात ‘या’ तालुक्यातील लॉकडाउन उठवावे; व्यापाऱ्यांची मागणी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 09 ऑक्टोबर 2021 :- श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी मध्ये कोरोनाचे रुग्ण वाढल्याचा प्रशासनाचा दावा असल्याने काष्टी बंद करण्यात आले आहे. मात्र, प्रत्यक्षात बाहेरचे रुग्ण काष्टीतील दाखविल्याने गोंधळ झाला.

त्यामुळे किमान सणासुदीच्या काळात तालुक्यातील लॉकडाउन उठवावे, अशी मागणी करीत काष्टीतील व्यापाऱ्यांनी तहसीलदारांकडे केली आहे.

लॉकडाउनमुळे तालुक्यातील नऊ गावे बंद आहेत. दसरा- दिवाळी तोंडावर आल्याने व्यापारी या बंदमुळे मेटाकुटीला आले आहेत. त्यामुळेच काष्टीतील व्यापाऱ्यांनी एकजूट दाखवीत, तहसील कार्यालयापुढे उपोषण केले.

यावेळी काष्टी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष संजय काळे म्हणाले, की काष्टीतील बंदमुळे व्यापाऱ्यांसोबतच सामान्यांचे नुकसान झाले. कोरोनाचे अन्य ठिकाणचे रुग्ण काष्टीत दाखविले यात आमचा दोष नाही.

प्रशासनाने त्यांच्या चुका सुधाराव्यात, आम्ही मदत करू. हातावर पोट असणाऱ्यांची जशी कोंडी झाली, तसेच कर्ज घेऊन व्यापार उभारणाऱ्यांचा कोंडमारा झाला आहे.

प्रशासनाने समजून घेऊन मदत करावी. दरम्यान सध्याच्या बंदमध्ये वेळेची काही सूट देता येते का, याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे. लोकांनी कोरोनाचे नियम पाळून लसीकरणातील सहभाग वाढवावा, असे आवाहन त्यांनी केले.